andhra pradesh politics : राजकीय लोकांनी केलेल्या प्रतिज्ञा व दिलेल्या आश्वासनांना जनता गंभीरपणे घेतेच असं नाही. त्यात ह्या प्रतिज्ञा निवडणूक प्रचाराच्या काळात केलेल्या असतील तर त्याकडं कुणी लक्षही देत नाही. मात्र, आंध्र प्रदेशातील एक नेता यास अपवाद ठरला आहे. या नेत्यानं प्रचारादरम्यान दिलेला शब्द पाळण्यासाठी चक्क स्वत:चं नाव बदललं आहे.
मुद्रागडा यांनी गेल्या मार्च महिन्यात वायएसआर काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. मुद्रागडा यांनी पवन कल्याण यांना आव्हान दिलं होतं. पवन कल्याण यांनी विधानसभा निवडणूक जिंकल्यास मी नाव बदलेन, अशी शपथ त्यांनी घेतली होती. आपल्या नावात रेड्डी ही पदवी जोडेन, असं त्यांनी सांगितलं होतं. आता पवन कल्याण विजयी झाल्यानंतर मुद्रागडा यांनी आपलं वचन पूर्ण केलं आहे.
पवन कल्याण यांनी काकीनाडा जिल्ह्यातील पिथापुरम मतदारसंघात वायएसआर काँग्रेसच्या माजी खासदार वंगा गीता विरुद्ध ६५ हजारपेक्षा जास्त मतांनी विजय मिळवला आहे. त्यामुळं आता मुद्रागडा यांनी अधिकृतरित्या स्वत:चं नाव मुद्रागदा पद्मनाभ रेड्डी असं केलं आहे. हे बदललेलं नाव आंध्र प्रदेशच्या राजपत्रात नोंदवण्यात आलं आहे.
पवन कल्याण यांचा पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा (एनडीए) भाग आहे. ते आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री बनले आहेत. मुद्रागडा आणि पवन कल्याण हे दोघेही कापू समाजातील आहेत. निवडणूक प्रचारादरम्यान मुद्रागडा यांनी कापू समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली होती. तसंच, पवन कल्याण हे आरक्षणास पाठिंबा देत नसल्याची टीकाही त्यांनी केली होती.
वायएसआर काँग्रेस सरकारनं अनेक विकासकामं केली. असं असतानाही मतदारांनी जगन मोहन रेड्डी यांना नाकारलं. हे खरोखरच आश्चर्यकारक असल्याचं ते म्हणाले.
पवन कल्याण यांनी गेल्या बुधवारी अमरावती येथील सचिवालयात आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला. यासोबतच त्यांच्याकडं पंचायत राज, ग्रामविकास आणि पर्यावरण मंत्रीपदाची जबाबदारीही देण्यात आली आहे. कल्याण यांनी पंचायत राज मंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर नरेगाची कामे फलोत्पादनाशी जोडण्यासंबंधीच्या फायलींवर स्वाक्षऱ्या केल्या. याशिवाय आदिवासी गावांमध्ये आदिवासी पंचायतींनाही मान्यता देण्यात आली.
संबंधित बातम्या