मध्य प्रदेश राज्यातील भोपाळमध्ये मंगळवारी एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका महिलेने तीन चिमुकल्या मुलींसह गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेत महिलेसह तिघींचा मृत्यू झाला. तर एक मुलगी रुग्णालयात दाखल आहे. तिची प्रकृती चिंताजनक आहे.
मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमधील गुनगा पोलीस ठाणे क्षेत्रातील रोंडिया गावात ही घटना घडली आहे. संजीता (वय २८) मुलगी आराध्या (५ वर्ष), सृष्टि (दीड वर्ष) अशी मृतांची नावे आहेत. तर अडीच वर्षाची मुलगी रुग्णालयात दाखल आहे. तिच्यावर उपचार सुरू आहे. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून घटनेची चौकशी केली जात आहे.
भोपाळचे एसपी (ग्रामीण) प्रमोद कुमार सिन्हा यांनी सांगितले की, आम्हाला सकाळी साडे सात वाजता माहिती मिळाली की, रोंडिया गावात एका महिलेने आपल्या मुलींसह गळफाळ घेऊन आत्महत्या केली आहे. त्यानंतर पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. या घटनेत महिला व दोन मुलींचा मृत्यू झाला आहे. एका मुलीला रुग्णालयात दाखल केले आहे.
पोलिसांनी सांगितले की, आतापर्यंतच्या तपासात समोर आले की, महिला सासरच्या लोकांकडून होणाऱ्या शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळली होती. तिचा दारुडा पती तिला मारहाण करत होता. तीन मुलीच झाल्याने तसेच हुंड्यासाठी तिचा छळ सुरू होता. आम्ही प्रत्येक बाजुंनी तपास करत असून जे तथ्य समोर येतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.
संबंधित बातम्या