पश्चिम बंगालच्या उत्तर २४ परगणा जिल्ह्यात एका नेत्याच्या घरी छापा टाकण्यासाठी गेलेल्या सक्तवसुली संचालनालयाच्या (Enforcement Directorate) पथकावर जमावानं हल्ला केल्याची घटना घडली आहे. जमावानं त्यांच्या गाड्यांचीही तोडफोड केली आहे.
कोट्यवधी रुपयांच्या रेशन घोटाळ्या प्रकरणी ईडीचा तपास सुरू आहे. त्याचाच भाग म्हणून आज सकाळपासून ईडीचे अधिकारी तृणमूल काँग्रेसचे स्थानिक नेते शाहजहान शेख व शंकर आद्या यांच्या घरी व त्यांच्या नातेवाईकांच्या घरांवर व कार्यालयांची झाडाझडती घेत होते. केंद्रीय सुरक्षा दलाचे जवानही अधिकाऱ्यांसोबत होते.
सुरुवातीला काही ठिकाणी झाडाझडती घेतल्यानंतर ईडीचं एक पथक शाहजहान शेख यांच्या घरी पोहोचलं. तिथं त्यांनी शेख यांना फोन केला. मात्र कोणीही दरवाजा उघडला नाही, तेव्हा अधिकाऱ्यांनी दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला. शेख किंवा त्यांचे कुटुंबीय घरात होते की नाही हे कळू शकले नाही.
झाडाझडतीसाठी घरात प्रवेश करण्याचे ईडीच्या अधिकाऱ्यांचे प्रयत्न सुरू असतानाच काही महिलांसह शेकडो ग्रामस्थ घटनास्थळी जमा झाले. त्यांनी ईडी अधिकाऱ्यांविरोधात घोषणाबाजी आणि शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यांनी अधिकाऱ्यांवरही हल्ला केला आणि एका वाहनाचं नुकसान केलं, अशी माहिती एका गावकऱ्यानं मीडियाला दिली. भीतीनं ईडीच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळावरून पळ काढला.
याच जिल्ह्यात आद्या आणि त्यांच्या नातेवाईकांच्या घरांवर आणि कार्यालयांवरही एकाच वेळी छापे टाकण्यात आले. या रेशन घोटाळ्यात राज्यातील एक मंत्री ज्योती प्रिया मल्लिक यांना आधीच अटक करण्यात आली आहे. ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
काँग्रेस नेते अधीररंजन चौधरी यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. सत्ताधारी पक्षाच्या गुंडांनी हे कृत्य केलं आहे. राज्यात कायदा-सुव्यवस्था राहिली नाही हेच यातून स्पष्ट झालं आहे, असं ते म्हणाले. 'ईडीच्या अधिकाऱ्यांनी यापुढं पुरेशी सुरक्षा व्यवस्था घेऊन कारवाई करायला हवी. आज अधिकारी जखमी झाले आहेत, उद्या त्यांचा खूनही होऊ शकतो, अशी भीती चौधरी यांनी व्यक्त केली.
संबंधित बातम्या