Meerut Murder : बनारसमध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांची हत्या करण्यात आल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. ही घटना ताजी असतांना आता अशीच एक घटना मेरठमध्ये उघडकीस आली आहे. येथील लिसरी गेट येथील सुहैल गार्डन कॉलनीत एकाच कुटुंबातील पाच जणांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. मृतांमध्ये तीन लहान मुलांचा समावेश आहे. सर्व मृतदेह घरातच आढळून आले. ही हत्या कोणी आणि का केली, याचा शोध पोलिस घेत आहेत.
या भयानक हत्याकांडाची माहिती मिळताच एसएसपीसह सर्व अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. तपासासाठी गुन्हे शाखा आणि फॉरेन्सिक पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आलं आहे. श्वान पथकालाही पाचारण करण्यात आलं असून आरोपीचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोईन, अस्मा (वय ८), अफसा (वय ८), अजीजा (वय ४) आणि आदिबा (वय १) अशी मृतांची नावे आहेत. पती, पत्नी आणि तीन मुलांची हत्या करून मृतदेह बेडच्या बॉक्समध्ये लपवून ठेवण्यात आले होते. मुलांचे मृतदेह एका पोत्यात बांधून बेडच्या बॉक्समध्ये ठेवण्यात आले होते. मोईन हा मिस्त्री म्हणून काम करत असून घराभोवती लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने पोलिस सुगावा शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.
मारेकऱ्यांनी पाचही जणांची हत्या केल्यानंतर घराला बाहेरून कुलूप लावून पळ काढला होता. त्यामुळे घराला कुलूप लावून कुटुंब कुठं गेलं, हे कुणालाच माहीत नव्हतं. कुटुंबाला फोन लावला तरी समोरून कोणतंच उत्तर मिळत नव्हतं. अखेर मृत व्यक्तीच्या भावानं घराचं कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला असता सगळ्यांना धक्का बसला.
गुरुवारी सायंकाळी मोईनचा भाऊ सलीम हा घरी आला असता हे हत्याकांड उघडकीस आलंन. सलीम पत्नीसह भावाच्या घरी पोहोचला तेव्हा घराचा दरवाजा आतून बंद होता. शेजाऱ्यांशी चर्चा केली असता बुधवारपासून कोणीही दिसत नसल्याचं निदर्शनास आलं. यानंतर दरवाजा तोडण्यात आला. आत गेल्यावर तिथलं दृश्य पाहून सर्वांना धक्का बसला. मोईन आणि अस्मा यांचे मृतदेह जमिनीवर पडले होते. बेडच्या बॉक्समध्ये मुलांचे मृतदेह आढळून आले. तर घरातील सामान अस्तव्यस्त पडलं होतं.
मेरठपूर्वी पाच नोव्हेंबरला वाराणसीत एकाच कुटुंबातील पाच जणांची हत्या करण्यात आली होती. आईसह तीन मुलांची तर दुसऱ्या घरात वडिलांची हत्या करण्यात आली. खुनाचा संशय असलेल्या तरुण फरार आहे. या प्रकरणाचा छडा अद्याप लागला नाही. त्यात आता आणखी एक हत्याकांड घडल्यामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे.
राजेंद्र प्रसाद गुप्ता, त्यांची पत्नी नीतू, मुलगी गौरांगी आणि मुले नामेंद्र आणि सुबेंद्र अशी मृतांची नावे आहेत. राजेंद्र प्रसाद यांच्या भावाचा मुलगा विशाल याने सर्वांची हत्या केल्याचा पोलिसांना संशय होता, मात्र आरोपी हा फरार आहे. आश्चर्याची बाब म्हणजे पोलिसांनी त्याच्या संपत्ती जप्तीचा आदेश देखील दिला आहे. ज्या घरात राजेंद्र प्रसाद यांच्या कुटुंबाची हत्या करण्यात आली आहे, त्या घरावर जप्तीची नोटीसही चिकटवण्यात आली आहे.
संबंधित बातम्या