भारतीय लष्कराच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानातील बड्या नेत्यांची बोलती बंद झाली असून सर्वजण भीतीच्या छायेत वावरत आहेत. काही दिवसांपूर्वी भारताला अणुबॉम्बची धमकी देणारे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांची मुलगी मरियम नवाज आता बेपत्ता झाली आहे. भारताने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर पंजाब प्रांतात बुधवारी आणीबाणी जाहीर करण्यात आली असून सर्व शैक्षणिक संस्था बंद ठेवण्यात आल्या आहेत.
पंजाब प्रांत सरकारने एका निवेदनात म्हटले आहे की, पंजाबच्या मुख्यमंत्री मरियम नवाज यांनी संपूर्ण प्रांतात आणीबाणी जाहीर केली आहे. पंजाब पोलिसांसह सर्व सुरक्षा यंत्रणांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. पंजाबमधील सर्व डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. सर्व कर्मचाऱ्यांना तात्काळ ड्युटीवर हजर होण्याचे आदेश देण्यात आले असून पंजाबमधील सर्व जिल्ह्यांतील प्रशासनालाही हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे.
नागरी संरक्षणासह सर्व संबंधित संस्थांच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बोलावण्यात आले आहे. बुधवारी शैक्षणिक संस्था बंद राहतील, असे निवेदनात म्हटले आहे. भारताने केलेल्या हल्ल्यानंतर सर्व विमानसेवा बंद करण्यात आली असली तरी आता पाकिस्तानची हवाई हद्द अंशत: खुली करण्यात येत आहे.
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय लष्कराने मंगळवारी रात्री 'ऑपरेशन सिंदूर'अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळांवर क्षेपणास्त्र हल्ले केले. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात २६ जण ठार झाले होते, त्यात बहुतांश पर्यटक होते. पंजाब प्रांत आणि पाकव्याप्त काश्मीरमधील शहरांवर मंगळवारी रात्री उशिरा भारताने केलेल्या हल्ल्यात २६ जण ठार तर ४६ जण जखमी झाल्याची माहिती पाकिस्तानी लष्कराने दिली आहे.
पाकिस्तान हा अण्वस्त्र असलेला देश आहे, त्यामुळे त्यावर कोणीही सहजासहजी हल्ला करू शकत नाही, असे वक्तव्य मरियम नवाज यांनी केले होते. पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज (पीएमएल-एन) चे नेते आणि माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांची कन्या मरियम नवाज यांनी पहलगाम हल्ल्यानंतर एका समारंभाला संबोधित करताना भारताला अणुबॉम्बचा इशारा देत म्हटले की, आज भारत-पाक सीमेवर तणावाचे वातावरण आहे, पण घाबरून जाण्याचे कारण नाही. अल्लाहने पाकिस्तानी सैन्याला देशाच्या रक्षणाचे बळ दिले आहे.
मरियम नवाज यांनी म्हटले की, आपण अण्वस्त्रधारी देश आहोत, त्यामुळे पाकिस्तानवर कोणीही सहजासहजी हल्ला करू शकत नाही. आपली राजकीय विचारसरणी काहीही असली तरी बाह्य आक्रमणाविरोधात आपण लष्कराच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. पाकिस्तानला अणुशक्ती बनविण्याचे श्रेय मरियम यांनी आपले वडील नवाझ शरीफ यांना देताना म्हटले की, 'पाकिस्तानची ताकद हुतात्म्यांच्या बलिदानातून येते आणि नवाझ शरीफ यांनी देशाला अणुशक्ती बनविण्यात ऐतिहासिक भूमिका बजावली. "
संबंधित बातम्या