Lok Sabha Election 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीत केंद्रातील मोदी सरकारसमोर कडवं आव्हान उभं करण्याच्या प्रयत्नात असलेल्या इंडिया आघाडीला मोठा धक्का बसला आहे. इंडिया आघाडीतील एक प्रमुख नेत्या व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आगामी लोकसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. ममतांच्या या निर्णयामुळं इंडिया आघाडीच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
'इंडिया आघाडी'च्या नावाखाली राष्ट्रीय पातळीवर अनेक विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. सुरुवातीच्या काही बैठकांनंतर इंडिया आघाडीतील पक्षांमध्ये राज्याराज्यांत जागावाटपाची चर्चा सुरू आहे. काँग्रेसची चांगली ताकद असलेल्या दिल्ली, पंजाब, पश्चिम बंगाल यांसारख्या राज्यांत जागावाटपाचा मोठा पेच होता. सध्या ईडीच्या रडारवर असलेल्या अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेससोबत सामोपचाराची भूमिका घेतली आहे. मात्र, ममता बॅनर्जी जागावाटपात कोणतीही तडजोड करण्यास तयार नव्हत्या.
पश्चिम बंगालमध्ये लोकसभेच्या ४२ जागा आहेत. त्यापैकी दोन जागा काँग्रेसनं लढवाव्यात, असा प्रस्ताव ममता बॅनर्जी यांनी दिला होता. त्यावर काँग्रेसनं तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्या पार्श्वभूमीवर तृणमूल काँग्रेसची बैठक मंगळवारी पार पडली. या बैठकीत ममता बॅनर्जी यांनी आपला निर्णय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसमोर जाहीर केला. त्यानंतर स्वत: ममता बॅनर्जी यांनी निर्णयाची माहिती दिली. तृणमूल काँग्रेस राज्यातील सर्व मतदारसंघांमध्ये लोकसभा निवडणूक लढविणार आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अधीररंजन चौधरी हे ममता बॅनर्जी यांच्यावर सातत्यानं टीका करत असतात. चौधरी यांनी मंगळवारी देखील ममतांवर हल्ला चढवला होता. ममता बॅनर्जी या संधीसाधू आहेत. त्यांच्या दयेवर आम्ही निवडणूक लढवणार नाही,' असं त्यांनी सुनवालं होतं. त्यामुळं काँग्रेस आणि तृणमूल यांच्यातील दरी अधिकच वाढली होती. अखेर आज ममता बॅनर्जी यांनी स्वबळाची घोषणा केली. या निर्णयानंतर त्या इंडिया आघाडीत राहणार का यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
संबंधित बातम्या