बांगलादेशात निर्माण झालेल्या राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बांगलाादेशात संयुक्त राष्ट्रसंघाचे शांतता दल तैनात करण्याची मागणी केली आहे. बांगलादेशातील धार्मिक अल्पसंख्याकांच्या सुरक्षिततेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हस्तक्षेप करावा, अशी मागणीही बॅनर्जी यांनी केली आहे.
पश्चिम बंगाल विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनास आजपासून प्रारंभ झाला. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी संबोधित करताना ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारकडे वरील मागणी केली. ‘भारत सरकार हे प्रकरण संयुक्त राष्ट्रसंघासमोर मांडू शकते. त्यामुळे बांगलादेशात शांतता दल पाठवले जाऊ शकते’ असे ममता बॅनर्जी म्हणाल्या.
‘बांगलादेशात आमचे कुटुंबीय राहतात, त्यांच्या अनेक मालमत्ता आहेत… या विषयावर भारत सरकार जी काही भूमिका घेईल ती आम्हाला मान्यच आहे. जगात कुठेही धार्मिक आधारावर होणाऱ्या अत्याचारांचा आम्ही निषेध करतो. त्यामुळे बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या हिंसाचार प्रकरणात केंद्र सरकार आणि पंतप्रधानांना हस्तक्षेप करण्याचे आवाहन करतो.’ असं ममता बॅनर्जी म्हणाल्या.
बांगलादेशातील हिंदू नेते चिन्मय कृष्ण दास यांना अटक करून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, ‘इस्कॉन’च्या कोलकाता युनिटच्या प्रमुखांशी बोलून त्यांना पाठिंबा दर्शवल्याची माहिती मुख्यमंत्र्यी ममता बॅनर्जी यांनी दिली.
बांगलादेशात भारतीयांवर सुरू असलेले हल्ले आम्ही खपवून घेणार नाही, असे त्या म्हणाल्या. हिंसाचाराची झळ सोसलेल्या भारतीयांची सुटका करून त्यांना भारतात आणून त्यांचे पुनर्वसन करण्याची तातडीची गरज असल्याचे मुख्यमंत्री बॅनर्जी म्हणाल्या. गरज पडल्यास आमच्या ताटातली 'एक रोटी' त्यांच्यासोबत शेअर करायला आमची काहीच हरकत नाही. त्यांच्यासाठी अन्नाची कमतरता भासू देणार नाही, असं त्या म्हणाल्या. बांगलादेश आणि इतरत्र राहणाऱ्या सर्व समुदायांमध्ये सौहार्द, बंधुता आणि मैत्रिपूर्ण संबंध असावेत अशी इच्छा ममता बॅनर्जी यांनी बोलून दाखवली.
दरम्यान, बांगलादेशातील हिंसाचाराच्या मुद्दावर ममता बॅनर्जी या मगरीचे अश्रू ढाळत असल्याची प्रतिक्रिया भाजपने व्यक्त केली आहे. आपली मुस्लिम व्होट बँक मजबूत करण्यासाठी त्यांनी हिंदू धार्मिक संघटनांना लक्ष्य केल्याचा आरोप भाजपने केला आहे.
काही दिवसांपूर्वी ममतांनी स्वतःची मुस्लिम व्होट बँक मजबूत करण्यासाठी पश्चिम बंगालमधील रामकृष्ण मिशन, भारत सेवाश्रम संघ आणि इस्कॉन सारख्या धार्मिक संघटनांना वैयक्तिकरित्या लक्ष्य केले होते, असं भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील पोस्ट मध्ये म्हटले आहे.
संबंधित बातम्या