Political Crisis: काँग्रेस अलर्ट.. ‘या’ नेत्याला दिली डॅमेज कंट्रोलची जबाबदारी
शिवसेनेमध्ये बंड झालेलं असतानाच आता काँग्रेसही अलर्ट मोडवर आली आहे. महाराष्ट्रात निर्माण झालेल्या राजकीय संकटावर चर्चा करण्यासाठी काँग्रेसने कमलनाथ (Kamal Nath)यांची पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.
नवी दिल्ली–शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर राज्यात राजकीय पेच निर्माण झाला आहे. त्यापार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज जी शिवसेनेची अवस्था आहे, ती उद्या काँग्रेस व राष्ट्रवादीची होऊ शकते, असा इशारा दिल्याने काँग्रेस अलर्ट झाली आहे.
विधान परिषदेच्या निकालानंतर (Vidhan Parishad Elections) राज्यात राजकीय भूकंप आला आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांनी २९ आमदार सोबत घेऊन पक्षाविरोधात बंड केल्याने खळबळ माजली आहे. शिवसेनेतल्या या बंडानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) वर्षा बंगल्यावर एकामागोमाग एक बैठका घेत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या अत्यंत जवळचे असे मिलिंद नार्वेकर एकनाथ शिंदेंशी बोलण्यासाठी सूरतला गेले आहेत.
एकीकडे शिवसेनेमध्ये बंड झालेलं असतानाच आता काँग्रेसही अलर्ट मोडवर आली आहे. महाराष्ट्रात निर्माण झालेल्या राजकीय संकटावर चर्चा करण्यासाठी काँग्रेसने कमलनाथ (Kamal Nath) यांची पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. महाविकास आघाडीच्या घटकपक्षांसोबत कमलनाथ हे चर्चा करणार आहेत.
विशेष म्हणजे कमलनाथ हे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री असताना ज्योतिरादित्य शिंदे यांनीच बंड करत भाजपचं कमळ हातात घेतलं. ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासह आमदार काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर कमलनाथ यांना मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं होतं.
काल झालेल्या विधान परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या चंद्रकांत हांडोरे यांचा पराभव झाला. काँग्रेसमध्येच क्रॉस व्होटिंग झाल्यामुळे आणि काही मतं फुटल्यामुळे काँग्रेसच्या गोटातही चिंतेचं वातावरण आहे.
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली १० आमदार बाहेर पडण्याचा तयारीत असल्याचे समजते. विधानपरिषदेत झालेल्या पराभवानंतर विजय वडेट्टीवार आपल्या १० आमदारांसोबत बाहेर पडणार असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. दरम्यान काँगेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरातही नाराज असल्याचे बोलले जात आहे. यामुळे शिवसेनेपाठोपाठ काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत दुफळी दिसून येत आहे.