Shivraj Shingh gives credit to PM Narendra Modi : चार राज्यांतील विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असून वेगानं निकाल हाती येत आहेत. भारतीय जनता पक्ष मध्य प्रदेशात पुन्हा एकदा सत्ता स्थापन करण्याची शक्यता आतापर्यंतच्या निकालावरून दिसत आहे. भाजपनं या राज्यात मोठी आघाडी घेतली आहे. विजयाची शक्यता दिसताच मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
मध्य प्रदेशचा निकाल भाजपच्या बाजूनं लागेल असा अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला होता. मात्र, भाजपचा मोठा विजय होईल अशी अपेक्षा नव्हती. सध्या तरी भाजप खूप मोठी आघाडी घेताना दिसत आहे. शिवराज सिंह यांची ‘लाडली बहना योजना’ राज्यात लोकप्रिय ठरल्याची चर्चा आहे. त्याचा फायदा भाजपला मिळाल्याचं बोललं जात आहे. मात्र, शिवराज सिंह यांनी भाजपच्या घोडदौडीचं श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह व कार्यकर्त्यांना दिलं आहे.
‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशात अनेक सभा घेतल्या. जनतेला आवाहन केलं. त्यांचं आवाहन जनतेनं डोक्यावर घेतलं. पंतप्रधानांची भूमिका लोकांना पटली हेच सध्याच्या ट्रेंडवरून दिसत आहे. लोकांनी डबल इंजिन सरकारला पाठिंबा दिल्याचं दिसून येतंय, असं शिवराज म्हणाले.
'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारनं केलेल्या कामाची, आखलेल्या योजनांची आम्ही राज्यात प्रभावी अंमलबजावणी केली. ‘लाडली लक्ष्मी’पासून ते ‘लाडली बहना’पर्यंत आम्ही राबवलेल्या योजना लोकांना आवडल्या आहेत. गृहमंत्री अमित शाह यांनीही इथं भरपूर मार्गदर्शन केलं आणि त्यामुळं वातावरण बदलण्यास मदत झाली. भाजपच्या कार्यकर्त्यांनीही प्रचंड मेहनत घेतली, असंही शिवराज यांनी सांगितलं.
मतमोजणी सुरू होण्याआधी शिवराज सिंह यांनी एक ट्वीट केलं होतं. त्यातही त्यांनी विजयाचा विश्वास बोलून दाखवला होता. 'आज मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीचे निकाल येत आहेत. जनतेच्या आशीर्वादानं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वामुळं भारतीय जनता पक्ष पुन्हा पूर्ण बहुमतानं सरकार स्थापन करेल असं माझा विश्वास आहे, असं त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
भाजपनं मध्य प्रदेशात मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून शिवराज सिंह यांच्या नावाची घोषणा केली नव्हती. जवळपास २० वर्षे मुख्यमंत्री असलेल्या शिवराज यांच्या विरोधात वातावरण असल्याची चर्चा होती. मात्र, शिवराज यांनी ही चर्चा खोटी ठरवली आहे.
संबंधित बातम्या