अमित शहा वेडे झालेत; सोनिया गांधींची भेट घेण्याआधी लालू प्रसाद यादव यांची टीका
Lalu Prasaad Yadav: लालु प्रसाद यादव हे २५ सप्टेंबरला दिल्लीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधीची भेट घेणार आहेत. यावेळी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हेसुद्धा सोबत असणार आहेत.
Lalu Prasaad Yadav: आरजेडी प्रमुख लालु प्रसाद यादव यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. लालु प्रसाद यादव यांनी शनिवारी म्हटलं की, अमित शहा हे पूर्णपणे वेडे झाले आहेत. त्यांचे सरकार बिहारमधून हटवलं आहे. भाजपला २०२४ मध्येही पराभवाचा सामना करावा लागेल. तसंच प्रश्नार्थक स्वरात बोलताना गुजरातमध्ये असताना त्यांनी असं केलं होतं का असंही लालु प्रसाद यादव म्हणाले. दिल्लीला जाण्यासाठी पाटणा विमानतळावर पोहोचल्यानंतर लालु प्रसाद यादव यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.
अमित शहांवर आरोप करताना लालु प्रसाद यादव म्हणाले की, "ते गुजरातमध्ये होते तेव्हा तिथे जंगल राज होतं." भाजप २०२४ ला केंद्रात आणि त्यापुढच्या वर्षी बिहारमध्ये सत्तेत येईल असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला होता. त्याबाबत विचारलं असता लालु प्रसाद यादव म्हणाले की, "आम्ही ते पाहू." लालु प्रसाद यादव हे २५ सप्टेंबरला दिल्लीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधीची भेट घेणार आहेत. यावेळी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हेसुद्धा सोबत असणार आहेत.
आरजेडी प्रमुख लालु प्रसाद यादव म्हणाले की, "येत्या निवडणुकीत बिहारमधून भाजपचा सुपडा साफ होईल. अमित शहा निवृत्त होतील. बिहारमध्ये त्यांना यश मिळणार नाही." सत्तेसाठी भविष्यात नितीशकुमार राजदला सोडतील यावरून विचारले असता लालु प्रसाद यादव म्हणाले की, "ते आता सोबत आहेत." लालु प्रसाद यादव हे सध्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे फारसे बाहेर पडत नाहीत. तरी त्यांनी म्हटलं की, "विरोधकांच्या एकतेसाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. तसंच हाच आमच्या बैठकीचा अजेंडा असेल."
संबंधित बातम्या