lizard found in water bottle in jharkhand : काही दिवसांपूर्वी वंदे भारत एक्सप्रेसमध्ये मिळणाऱ्या जेवणात झुरळ आढळले होते. त्यानंतर मुंबईत आइसक्रीममध्ये माणसाचं तुटलेलं बोट आढळले होते. तर जामनगरमध्ये चिप्सच्या पाकिटात मेलेले बेडूक आढळले होते. या घटना ताज्या असतांना आता झारखंड येथे बाटलीबंद पाण्यात मृत पाल सापडली आहे. रेल्वे स्थानकाजवळ ग्राहकाने खरेदी केलेल्या बाटली बंद पाण्यात ही पाल आढळल्याने खळबळ उडाली आहे. तसेच रेल्वे स्थानकावरील खाद्य पदार्थासोबतच आता बाटलीबंद पाण्याच्या दर्जावर देखील प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.
रेल्वे स्थानकावरील पाण्याच्या दर्जा बाबत नेहमी प्रश्नउपस्थित केले जातात. हे नागरिक पिण्यास नागरिक नापसंती दर्शवत असतात. यामुळे नागरिक ब्रँडेड पाण्याच्या बाटल्या घेण्यासाठी प्राधान्य देत असतात मात्र रेल्वे स्थानकावर आता डुप्लिकेट बाटलीबंद पाण्याची देखील बिनदिक्कत विक्री होत असल्याने या पाण्याच्या दर्जावर देखील प्रश्न उपस्थित होत आहे. त्यात आता बाटली बंद पाण्यात पाल सापडण्याचा प्रकार म्हणजे भयावह आहे. झारखंड येथील टाटानगर रेल्वे स्थानकाच्या पार्किंगजवळ हा प्रकार उघकडीस आला काँग्रेस नेत्याने विकत घेतलेल्या बाटली बंद पाण्यात ही मेलेली पाल आढळली.
रविवारी दुपारी स्टेशन पार्किंगजवळ सिल्की ड्रॉपच्या बाटलीबंद पाण्यात पाल सापडल्याने टाटानगर मंडल काँग्रेसचे अध्यक्ष मुन्ना मिश्रा व बाटली विकत घेणारे अरुण सिंग यांनी संताप व्यक्त केला आहे. दुकानदार मोना साहू यांची चौकशी केल्यानंतर दोघांनी पाणी वितरकाला बोलावून या प्रकरणी चांगलेच खडसावले. याबाबत सोमवारी जिल्हा अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांकडे तक्रारही करण्यात आली आहे.
मुन्ना मिश्रा व अरुण सिंग हे त्यांच्या मित्रांसोबत स्थानकात बसले होते. त्यांनी तहान लागल्यावर टाटानगर स्टेशन पार्किंगजवळील मोना साहूच्या दुकानातून पाण्याची बाटली मागवली. मुन्ना बाटली उघडणार असतानाच अरुणच्या नजरेस बाटलीत मृत पाल असल्याचे दिसले. यामुळे त्यांनी पाण्याच्या बाटलीचे सील न तोडता बाटलीवर लिहिलेल्या क्रमांकावर फोन केला. बाटलीमध्ये मेलेली पाल आढळल्यानंतर विक्रेत्याने दुकान बंद करून तेथून पळ काढला.
मात्र, बागबेडा परिसरातील सिल्की ड्रॉप वॉटरचे वितरक हे तातडीने घटनास्थळी पोहोचले. वितरकाने हे प्रकरण मिटवण्याची विनंती केली, मात्र, दोघांनी असे करण्यास नकार दिला. वितरकाने मुन्ना मिश्राला सांगितले की जमशेदपूरमधील सिल्की ड्रॉप बाटली बंद पानी हे महामार्गावर स्थित भिलाई पहारी प्लांट व पश्चिम बंगालमधील बलरामपूर प्लांटमधून येते. अन्न सुरक्षा अधिकाऱ्याकडे पाण्याची विभागीय चाचणी करण्याची मागणी करणार असल्याचे मुन्ना मिश्रा यांनी सांगितले.
संबंधित बातम्या