मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Javed Akhtar : लाहोरला जाऊन पाकिस्तानला दिला तोंड दाबून बुक्क्यांचा मार; जावेद अख्तरांनी कमालच केली!

Javed Akhtar : लाहोरला जाऊन पाकिस्तानला दिला तोंड दाबून बुक्क्यांचा मार; जावेद अख्तरांनी कमालच केली!

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Feb 21, 2023 03:45 PM IST

Javed Akhtar In Lahor : भारतात पाकिस्तानी गायकांचे अनेक कार्यक्रम झाले, परंतु पाकिस्तानात लतादिदींचा कोणताही कार्यक्रम न झाल्याबद्दल अख्तर यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Javed Akhtar In Lahor Pakistan
Javed Akhtar In Lahor Pakistan (HT)

Javed Akhtar In Lahor Pakistan : बॉलिवून अभिनेत्री कंगना रणौतसोबत झालेल्या वादामुळं चर्चेत आलेले बॉलिवूडचे प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी पाकिस्तानच्या लाहोरमध्ये जाऊन पाकिस्तानी सरकारला खडेबोल सुनावले आहेत. मुंबईत अतिरेकी हल्ला घडवून आणणारे अनेक आरोपी अद्यापही तुमच्या देशात मोकाट फिरत असल्याचं सांगत जावेद अख्तर यांनी पाकिस्तानला चांगलंच फैलावर घेतलं आहे. लाहोरमध्ये उर्दू शायर फैज अहमद फैज यांच्या स्मरणार्थ आयोजित कार्यक्रमात जावेद अख्तर बोलत होते. त्यावेळी त्यांनी पाकिस्तानच्या भळभळत्या जखमेवर बोट ठेवत तुफान टोलेबाजी केली आहे.

लाहौरमधील कार्यक्रमात जावेद अख्तर यांना 'तुम्ही आता पाकिस्तानात आला आहात, भारतात गेल्यानंतर तुम्ही येथील लोकांबद्दल तिथं काय सांगाल?', असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी त्याचं उत्तर देताना अख्तर यांनी म्हटलं की, भारत असो किंवा पाकिस्तान, आपण एकमेकांवर आरोप करायला नको. त्यातून कोणताही प्रश्न सुटणार नाहीये. आमच्या मुंबईवर कसा अतिरेकी हल्ला झाला होता, हे अनेकांनी पाहिलेलं आहे. हल्ला करणारे दहशतवादी नॉर्वे किंवा इजिप्तमधून आलेले नव्हते. मुंबईवर हल्ल्याचा डाव आखणारे अनेक आरोपी अद्यापही तुमच्याच देशात मोकाटपणे फिरत आहेत, त्याची भारताकडून नेहमीच तक्रार होते, याचा अनेकांना त्रास होत असतो, असं म्हणत जावेद अख्तर यांनी पाकिस्तानी सरकारला चांगलंच फैलावर घेतलं आहे.

लतादीदींचा एकही कार्यक्रम पाकिस्तानात का झाला नाही?- अख्तर

दिग्गज पाकिस्तानी गायक नुसरत फतेह अली खान आणि मेहदी हसन यांचे अनेक कार्यक्रम भारतात झालेले आहेत. परंतु लता मंगेशकर यांचा एकही कार्यक्रम पाकिस्तानात का झालेला नाही?, असा सवाल जावेद अख्तर यांनी उपस्थित करताच सभागृहात भयानक शांतता पसरली होती. त्यामुळं आता जावेद अख्तर यांनी लाहोरमध्ये जाऊन पाकिस्तानला सुनावल्यामुळं त्यांची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे. काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतनं जावेद अख्तर यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर अख्तर यांनी कंगनाविरोधात अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला होता. परंतु आता जावेद अख्तर यांच्या या वक्तव्यांचं कंगनानंही कौतुक केलं आहे. त्यामुळं दोघांमधील वाद मिटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

IPL_Entry_Point