जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीचा निकाल समोर आला आहे. जम्मू भागात भाजपने चमकदार कामगिरी करत २९ जागा जिंकल्या आहेत. मात्र, जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसचे सरकार येणार असल्याचे स्पष्ट झालं आहे. जम्मूच्या श्री माता वैष्णोदेवी मतदारसंघाची बरीच चर्चा झाली होती. लोकसभा निवडणुकीत अयोध्येतील फैजाबाद आणि नंतर उत्तराखंडच्या बद्रीनाथ मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला होता, त्यानंतर लोकांच्या नजरा माता वैष्णोदेवी मतदारसंघाच्या निकालाकडे लागल्या होत्या. भाजपने येथे विजय मिळवला आहे.
जम्मूतील श्री माता वैष्णोदेवी मतदारसंघातून भाजपचे बलदेव राज शर्मा विजयी झाले आहेत. त्यांनी अपक्ष उमेदवार जुगल किशोर यांचा १९९५ मतांनी पराभव केला, तर काँग्रेसचे उमेदवार भूपिंदर सिंग तिसऱ्या क्रमांकावर राहिले. त्यांना ५६५५ मते मिळाली. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत फैजाबाद मतदारसंघात भाजपला पराभवाला सामोरे जावे लागले होते. येथे सपाचे अवधेश प्रसाद विजयी झाले, तर भाजपचे लल्लू सिंह पराभूत झाले होते. अयोध्या शहरही याच मतदारसंघात येते. याच अयोध्येत शेकडो वर्षांनंतर भव्य राम मंदिर उभारले गेले. यामुळे भाजपसाठी या मतदारसंघातील निकाल महत्वाचा होता. इतकंच नाही तर लोकसभा निवडणुकीत प्रभू श्रीरामांशी संबंधित इतरही अनेक क्षेत्रात भाजपचा पराभव झाला. तेव्हापासून धार्मिक स्थळांवरील निवडणुकीकडे लोकांचे विशेष लक्ष लागले आहे.
सार्वत्रिक निवडणुकीनंतर जुलै महिन्यात झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालातही भाजपला धक्का बसला. उत्तराखंडच्या बद्रीनाथमध्ये काँग्रेसचे उमेदवार लखपत सिंह यांनी भाजपचे राजेंद्र सिंह भंडारी यांचा पाच हजार मतांनी पराभव केला. हा मतदारसंघ चमोली जिल्हा आणि गढवाल भागाचा भाग आहे. त्यानंतरही धार्मिक स्थळांवरील मतदार भाजपवर नाराज आहेत का, अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. मात्र, आता जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीत श्री माता वैष्णोदेवी विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवाराने बाजी मारली आहे.
काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स-काँग्रेसचे सरकार स्थापन होत आहे. नॅशनल कॉन्फरन्सला जम्मू-काश्मीरमध्ये मोठं यश मिळालं आहे. २०१९ मध्ये कलम ३७० हटवल्यानंतर केंद्रशासित प्रदेशात प्रथमच विधानसभा निवडणुका झाल्या. तत्कालीन जम्मू-काश्मीर राज्यातून कलम ३७० रद्द केल्यानंतर राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन करण्यात आले. नॅशनल कॉन्फरन्सने ५१ जागा लढल्या होत्या त्यापैकी ४१ जागांवर विजय मिळवला आहे. तर मित्रपक्ष काँग्रेसने ३२ जागा लढवल्या होत्या, पण त्यांना केवळ सहा जागा जिंकता आल्या आहेत.
या केंद्रशासित प्रदेशात भाजपने २७ जागा जिंकल्या असून दोन जागांवर आघाडी घेतली आहे. निवडणुकीत सुपडासाफ झालेल्या पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या (पीडीपी) अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांची कन्या इल्तिजा मुफ्ती यांचाही सेफ सीटवर पराभव झाला आहे. इल्तिजा मुफ्ती यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर जारी केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, मी जनादेश स्वीकारतो. बिजबेहरामधील सर्वांकडून मला मिळालेले प्रेम आणि आपुलकी कायम माझ्यासोबत राहील. या प्रचारादरम्यान कठोर परिश्रम घेणाऱ्या पीडीपी कार्यकर्त्यांचे आभार.
संबंधित बातम्या