माजी क्रिकेटपटू अजय जडेजा याच्या शिरपेचात मानाचा तुरा! राजघराण्याचा वारसदार म्हणून झाली निवड
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  माजी क्रिकेटपटू अजय जडेजा याच्या शिरपेचात मानाचा तुरा! राजघराण्याचा वारसदार म्हणून झाली निवड

माजी क्रिकेटपटू अजय जडेजा याच्या शिरपेचात मानाचा तुरा! राजघराण्याचा वारसदार म्हणून झाली निवड

Published Oct 12, 2024 08:42 AM IST

Ajay Jadeja : गुजरातमधील जामनगर राजघराण्याचा नवा वारसदार म्हणून भारताचा माजी क्रिकेटपटू अजय जडेजा यांची निवड करण्यात आली आहे. जामसाहेब शत्रुशल्यसिंहजी महाराज यांनी शुक्रवारी ही घोषणा केली.

Ajay Jadeja
Ajay Jadeja (HT)

Ajay Jadeja news in marathi : गुजरातमधील जामनगरच्या राजघराण्यानं ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू अजय जडेजा याची या राजघराण्याचा उत्तराधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जामसाहेब शत्रुशल्यसिंहजी महाराज यांनी शुक्रवारी आपला वारस जाहीर केला. 

भारतीय संघाकडून १५ कसोटी आणि १९६ एकदिवसीय सामने खेळलेला ५३ वर्षीय अजय जडेजा हा जामनगर राजघराण्याचा वंशज आहे. त्यांचा जन्म १९७१ मध्ये नवानगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जामनगरमध्ये झाला. शत्रुसल्यासिंहजींचे चुलत बंधू आणि त्यांचे वडील दौलतसिंहजी जडेजा यांनी शुक्रवारी रात्री उशिरा पत्राद्वारे त्याला उत्तराधिकारी म्हणून घोषित केलं.

टाइम्स ऑफ इंडियानं या पत्राच्या आधारे वृत्त दिलं आहे. 'दसरा हा सण विजयाचं प्रतीक आहे. अजय जडेजानं माझा उत्तराधिकारी होण्याचा प्रस्ताव स्वीकारून या शुभ दिवशी मी माझा पेच सोडवला आहे. मला खात्री आहे की अजय जडेजा जामनगरच्या लोकांसाठी वरदान ठरेल आणि समर्पणभावानं त्यांची सेवा करेल. मी त्याचा खूप आभारी आहे, असं पत्रात नमूद करण्यात आलं आहे.

राजघराण्याचं क्रिकेटशी जवळचं नातं

भारतीय क्रिकेटशी जामनगर राजघराण्याचं अत्यंत जवळचं नातं आहे. माजी भारतीय क्रिकेटपटूच्या नातेवाईकांमध्ये दिग्गज क्रिकेटपटू के. एस. रणजितसिंहजी आणि के. एस. दुलीपसिंहजी यांचा समावेश आहे. क्रिकेटमधील रणजी ट्रॉफी आणि दुलीप ट्रॉफी ही त्यांच्याच नावे आहे. शत्रुसल्यासिंहजी हे प्रथम श्रेणी क्रिकेटपटू होते आणि नवानगरचे महाराज ही पदवी धारण करणारे शेवटचे व्यक्ती होते. प्रतिष्ठेच्या रणजी करंडक देशांतर्गत क्रिकेट चॅम्पियनशिपला त्यांचे पूर्वज सर रणजितसिंहजी विभाजी जडेजा यांचं नाव देण्यात आले आहे. १९०७ ते १९३३ या काळात ते नवानगरचे शासक होते.

का झाली अजय जडेजाची निवड?

'आजतक'च्या अहवालानुसार, सध्याचे जाम साहेब शत्रुशालीसिंहजी यांना मुलं नाहीत. त्यामुळं त्यांनी वारस म्हणून अजय जडेजाची निवड केली. जामसाहेब शत्रुशालीसिंहजींचे वडील दिग्विजयसिंह ३३ वर्षे राजा होते. १९९२ ते २००० या काळात भारतीय क्रिकेट संघाचा भाग असलेल्या अजय जडेजाचे नाव फिक्सिंगमध्ये आलं होतं. त्यामुळं त्याच्यावर बंदी घालण्यात आली होती. २००३ मध्ये दिल्ली उच्च न्यायालयानं ही बंदी उठवली पण तो पुन्हा क्रिकेट खेळू शकला नाही.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर