मध्यपूर्वेतील दोन मोठ्या देशांमध्ये भीषण युद्ध सुरू झाले आहे. गेल्या आठवड्यापासून तणाव वाढल्यानंतर इराण आणि इस्रायल सातत्याने एकमेकांवर क्षेपणास्त्र डागत आहेत. दरम्यान, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणमधील परिस्थिती गंभीर बनली आहे. इराणमध्ये आतापर्यंत २०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तणाव शिगेला पोहोचल्यानंतर इराणमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. त्याचबरोबर इराणनेही आपली हवाई हद्द बंद केल्याने भारतीयांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मात्र इराणने भारत सरकारचे आवाहन मान्य करत मोठा निर्णय घेतला आहे.
इराणमध्ये अडकलेल्या किमान १० हजार नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी सुरक्षित मार्ग उपलब्ध करून देण्याच्या भारताच्या विनंतीला इराणने सोमवारी प्रतिसाद दिला. भारताच्या विनंतीला उत्तर देताना इराणने म्हटले आहे की, सध्या देशाची हवाई हद्द बंद असल्याने विद्यार्थी अझरबैजान, तुर्कमेनिस्तान आणि अफगाणिस्तानमार्गे परत येऊ शकतात.
इराणमधील भारतीय दूतावासाने रविवारी परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून असल्याची माहिती दिली होती. इराणमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी दूतावास सातत्याने संपर्कात आहे. काही प्रकरणांमध्ये दूतावासाच्या मदतीने विद्यार्थ्यांना इराणमधील सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येत आहे, असे भारतीय दूतावासाने एका निवेदनात म्हटले आहे. इतर संभाव्य पर्यायांचाही विचार केला जात आहे. ”
संबंधित बातम्या