खाद्यतेल स्वस्त होणार? 'हा' देश भारताला पुरवणार एकूण गरजेच्या ६० टक्के तेल
भारतात जगातल्या सर्वात जास्त तेलाची आयात होते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून रशिया युक्रेन युद्धानं भारतात तेलाचे भाव भडकल्याचं चित्र होतं. आता मात्र शेजारी देशाने भारताला तेल देण्याचं ठरवलं आहे. त्यानं तेलाच्या किंतीत काही प्रमाणात खाली येतील अशी अपेक्षा आहे.
जगात सर्वात जास्त चमचमीत आणि तिखट खाल्लं जाणारा देश किंवा फोडणीचे पदार्थ सर्वात जास्त खाणारा देश म्हणून भारताकडे पाहिलं जातं. आपल्या देशाची खाद्य संस्कृतीच मुळात तेलाशी जोडली गेली असल्यानं तेलाशिवाय तसे फारच कमी खाद्यपदार्थ आपल्या देशात बनवले जातात.
मात्र गेले काही महिने रशिया आणि युक्रेन युद्धाचा थेट फटका भारताला बसला होता. याचं कारण म्हणजे भारतात सूर्यफुलाचं सर्वात जास्त म्हणजेच ८० टक्के तेल युक्रेनहुन येतं. मात्र युक्रेन युद्धानं भारताच्या तेलाच्या साठ्यावर परिणाम झाला आणि त्याचा थेट परिणाम तुमच्या आमच्या स्वयंपाकघरावर झाला.
गेल्या काही महिन्यात तेलाचे आकाशाला भिडलेले भाव सर्वाच्या चेहऱ्यावर चिंतेची सावली घेऊन आले होते. आता मात्र यातनं काहीसा दिलासा मिळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.भारताचा शेजारी देशारी देश इंडोनेशियाने भारताची ही कसर भरून काढण्याचं ठरवलं आहे. इंडोनेशियाने भारताला पामतेल निर्यातीला होकार दिलाय. त्यामुळे खाद्यतेल व्यापाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.
भारतातल्या एकूण मागणीच्या ६० टक्के पामतेल इंडोनेशियातनं भारतात पाठवलं जातं. त्यापाठोपाठ सोयाबीन तेल आणि सूर्यफुलाचं तेलही इंडोनेशिया भारताला पाठवतं. हॉटेलांमध्ये मुख्यत्वे पामतेलाचा वापर केला जातो.
अखिल भारतीय तेल असोसिएशननुसार भारतात एकूण मागणीच्या ८० टक्के कच्चे तेल आयात करावे लागते. इंडोनेशिया सरकारला तिथल्या निर्यातदारांच्या दबावाखाली झुकावं लागलं आहे. त्याच वेळेस भारतीय आयातदारांनी तिथे केलेल्या मुत्सद्देगिरीचा फायदा झाला आहे.आता इंडोनेशियातून २३ मे पासून खाद्यतेल आयातीला सुरुवात होणार असल्याचं असोसिएशनचे अध्यक्ष शंकर ठक्कर यांनी सांगितलं.
एक नजर टाकूया भारतातील खाद्यातेलांच्या मार्च आणि मे महिन्यातल्या तेलांच्या प्रति लिटर किमतींवर
प्रकार | मार्चमधील भाव | सद्यस्थिती |
पामतेल | १२५ ते १३५ | १४० ते १४५ |
सोयाबीन | १४५ ते १५० | १६० ते १७५ |
सूर्यफूल | १५५ ते १६० | १८५ ते १९५ |
शेंगदाणा | १७५ ते १९५ | १९५ ते २२५ |
राईसब्रान | १४० ते १४५ | १६० ते १७० |
युद्धामळे रशियाने १५ ते २० दिवसातनं एकदा एक जहाज मुंबईला रवाना केलं आहे. त्यामुळे खाद्यतेल भडकणं सहाजिक होतं. आता मात्र भारतीयांना इंडोनेशिया सरकारनं आनंदाची बातमी दिली आहे. आतातरी देशात तेलाच्या भावाच्या किंमतींमध्ये घट झालेली पाहायला मिळू शकते.