IND vs PAK : भारत आमची दखलच घेत नाही; पाकिस्तानचे राष्ट्रपती हतबल
IND-PAK Relations : भारताशी संबंध सुधारण्यासाठी आम्ही सर्व आघाड्यांवर प्रयत्न करत आहोत, परंतु त्याला प्रतिसाद मिळत नसल्याचं वक्तव्य पाकिस्तानी राष्ट्रपतींनी केलं आहे.
IND vs PAK On Peace : आम्ही भारताशी संबंध सुधारण्याचा सर्व आघाड्यांवर प्रयत्न करत आहोत, परंतु भारत 'नो पीस' या धोरणाचं पालन करत असल्याचा आरोप पाकिस्तानचे राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनी केला आहे. याशिवाय आम्हाला भारताशी मैत्री करायची आहे, परंतु त्याला प्रतिसाद मिळत नसल्याचं वक्तव्यही त्यांनी केले आहे. त्यामुळे आता दोन्ही देशातील तणाव वाढण्याची चिन्ह आहेत. एका कार्यक्रमात बोलताना पाकिस्तानी राष्ट्रपतींनी दोन्ही देशातील संबंध न सुधारल्याबद्दल खंत व्यक्त करत त्यासाठी भारताला जबाबदार धरलं आहे.
एका कार्यक्रमात बोलताना पाकिस्तानचे राष्ट्रपती आरिफ अल्वी म्हणाले की, आम्ही भारतासोबत संबंध सुधारण्यासाठी सर्व आघाड्यांवर प्रयत्न करत आहोत. वादग्रस्त मुद्द्यांवर तोडगा काढण्याचा आमचा प्रयत्न असून तरीदेखील संबंध न सुधारल्याने राष्ट्रपती अल्वींनी खंत व्यक्त केली आहे. याशिवाय चर्चेला प्रतिसाद देत नसल्याचं सांगत भारत 'नो पीस' धोरणाचा अवलंब करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. काही दिवसांपूर्वी भारताचा टी-ट्वेन्टी विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पराभव झाला होता, त्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाझ शरीफ यांनी भारताच्या पराभवाची खिल्ली उडवली होती. त्यानंतर आता पाकिस्तानी राष्ट्रपतींनी भारताशी संबंध खराब होत असल्यावरून प्रतिक्रिया दिली आहे.
आधी दहशतवाद आणि सीमेपलीकडून होणाऱ्या कारवायांवर आवर घाला, त्यानंतरच चर्चा होईल, अशी भूमिका भारतानं नेहमीच घेतलेली आहे. काश्मिरचा मुद्दा आणि अतिरेकी हल्ल्यांमुळे भारत आणि पाकिस्तानचे संबंध नेहमीच तणावाचे राहिलेले आहेत. २०१९ साली केंद्र सरकारने जम्मू-काश्मिरला विषेश राज्याचा दर्जा देणारं कलम ३७० रद्दबातल केलं होतं. त्यानंतर पाकिस्ताननं भारतीय राजदुताची हकालपट्टी केली होती. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये कुठलीही चर्चा झालेली नाही. दरम्यान काश्मिर हा भारताचा अविभाज्य भाग असून तो कायम राहील, अशी भूमिका भारतानं नेहमीच आंतरराष्ट्रीय पातळीवर मांडलेली आहे.