india china relations : पूर्व लडाख सेक्टरमध्ये भारत आणि चीनच्या सैनिकांची माघार घेण्यास सुरुवात झाली आहे. दोन्ही पक्षांमध्ये झालेल्या करारानुसार हे पाऊल उचलण्यात आले आहे. एका संरक्षण अधिकाऱ्याने शुक्रवारी सांगितले की, पूर्व लडाख सेक्टरमधील डेमचोक आणि देपसांग पठारावर दोन ठिकाणी चीनी सैन्य मागे हटत आहे. ते म्हणाले की, भारतीय लष्कराने देखील या भागात तैनात करण्यात आलेले लष्करी साहित्य मागे घेण्यास सुरुवात केली आहे. जून २०२० मध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षानंतर दोन्ही आशियाई देशांमधील संबंध तणावपूर्ण झाले होते. या करारामुळे भारत आणि चीनच्या सीमेवरील संघर्ष निवळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या साठी रशियाने मोठी भूमिका बजावली आहे.
भारत चीन सीमेवरील वादग्रस्त ठिकाणांहून सैन्य माघारी घेण्याबाबत सूत्रांनी सांगितले की, या साठी मोठा वेळ लागणार आहे. मात्र, ही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. भारत चीन दरम्यान शांतता कराराची घोषणा होताच सैन्य माघारीची तयारी सुरू करण्यात आली आहे. दुसऱ्या दिवशी दोन्ही देशांच्या स्थानिक लष्करी कमांडर्सची बैठकही झाली. सूत्रांनी सांगितले की, सैन्य माघारी घेण्याचा अर्थ असा नाही की चीनने पूर्णपणे माघार घेतली आहे. मात्र, रस्ता अडविणारी तात्पुरती बांधकामे हटवून सीमेवरील गस्त पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी दोन्ही देशांची कराराप्रती असलेली बांधिलकीही भविष्यात जपणे आवश्यक आहे.
वास्तविक नियंत्रण रेषेवरील (एलएसी) परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी भारत आणि चीनमध्ये व्यापक सहमती झाली असल्याची माहिती संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी दिली. त्यात सीमेवर पारंपारिक भागात गस्त घालणे आणि जनावरे चरण्यास परवानगी देणे यांचाही समावेश आहे. भारत आणि चीन एलएसीवरील काही भागातील मतभेद दूर करण्यासाठी लष्करी आणि राजनैतिक पातळीवर चर्चा करत आहेत. चर्चेनंतर समान आणि परस्पर सुरक्षेच्या तत्त्वाच्या आधारे सीमेवरील परिस्थिती पूर्वपदावर आणण्यावर व्यापक सहमती झाली.
पंतप्रधान मोदी-शी जिनपिंग यांनी केले कराराचे स्वागत केले आहे. चार वर्षांहून अधिक काळ सुरू असलेला दोन्ही देशातील लष्करी तणाव संपुष्टात आणण्यात हे मोठे यश मानले जात आहे. पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर गस्त घालण्याबाबत चीनसोबत करार झाल्याचे भारताने सोमवारी जाहीर केले. यामुळे देपसांग आणि डेमचोक भागात गस्त सुरू होणार असल्याचे समजते. दरम्यान, या दोन ठिकाणी दोन्ही देशात असलेले मंतभेट पूर्णपणे सुटलेले नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी ब्रिक्स परिषदेच्या निमित्ताने द्विपक्षीय बैठकीत भारत-चीन कराराचे समर्थन केले. २०२० च्या लष्करी संघर्षामुळे प्रभावित झालेले संबंध पूर्वपदावर आणण्याचे संकेत दोन्ही नेत्यांनी देत द्विपक्षीय संवाद यंत्रणा पूर्ववत करण्याचे मान्य केले आहे.
संबंधित बातम्या