मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  simranjit singh mann: १५ ऑगस्टला तिरंगा फडकवू नका; पंजाबमधील खासदाराच्या वक्तव्यानं खळबळ

simranjit singh mann: १५ ऑगस्टला तिरंगा फडकवू नका; पंजाबमधील खासदाराच्या वक्तव्यानं खळबळ

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
Aug 10, 2022 03:13 PM IST

simranjit singh mann comment on Tiranga: हर घर तिरंगा मोहिमेबाबत शिरोमणी अकाली दलाच्या नेत्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे आता भाजपने त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

अकाली दल (अमृतसर) खासदार सिमरनजीत यांचे वादग्रस्त वक्तव्य
अकाली दल (अमृतसर) खासदार सिमरनजीत यांचे वादग्रस्त वक्तव्य

Simranjit Singh Mann: देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा मोहिम राबवली जात आहे. दरम्यान, या योजनेला विरोध करत असताना शिरोमणी अकाली दलाचे (अमृतसर) प्रमुख आणि खासदार सिमरनजीत सिंह मान यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. पंजाबच्या संगरूर लोकसभा मतदारसंघातील खासदार सिमरनजीत यांनी लोकांना हर घर तिरंगा मोहिमेवर बहिष्कार टाकण्याचं आवाहन केलं आहे. यामुळे आता वाद निर्माण झाला आहे. सिमरनजीत मान यांनी बहिष्कार टाकण्याबाबत बोलताना म्हटलं की, "१४-१५ ऑगस्टला घर आणि कार्यालयात निशाण साहीब फडकवण्याची विनंती करतो. दीप सिद्धू आज आपल्यात नाहीत. त्यांनी सांगितलं होतं की शीख स्वतंत्र आणि एक वेगळा समुदाय आहे."

फुटीरतावादी नेते असलेल्या सिमरनजीत यांनी भारतीय सुरक्षा दलाला शत्रू संबोधलं आहे. "जनरल सिंह भिंडरावाले (ठार झालेले खलिस्तानी दहशतवादी) शत्रूच्या सैन्यासोबत लढताना शहीद झाले." असं वक्तव्य सिमरनजीत यांनी केलं आहे. बंदी घालण्यात आलेल्या शीख फॉर जस्टिसचा सदस्य असलेल्या दहशतवादी गुरपतवंत सिंह पन्नून याने एक व्हिडीओ मेसेजसुद्धा शेअर केला आहे. यात त्याने पंजाबच्या लोकांना तिरंगा जाळण्यास आणि स्वातंत्र्यदिनी खलिस्तानी झेंडा फडकावण्यास सांगितलं आहे.

शिरोमणी अकाली दलाच्या नेत्यांनी हर घर तिरंगा मोहिमेबाबत केलेल्या वक्तव्यांमुळे आता भाजपने त्यांच्यावर निशाणा साधला आहे. भाजप नेते विनित जोशी यांनी गुरपतवंत सिंह पन्नुन यांच्यावर टीका करताना म्हटलं की, लोकांनी खलिस्थानला नाकारलं आहे आणि मोठ्या कष्टानं मिळालेल्या शांततेचं मूल्य समजून घेतलं आहे. गुरपतवंत सिंह पन्नुन आयएसआयच्या तालावर नाचत आहे आणि देशात अशांतता निर्माण करायचा प्रयत्न करत आहे. 

आपचे प्रवक्ते मलविंदर सिंह कांग यांनीही यावरून सिमरनजित सिंह मान यांना सुनावले. ते म्हणाले की, "ज्या लोकांनी भारतीय संविधानानुसार शपथ घेतली त्यांचाही चेहरा उघड झाला आहे. त्यांना जास्त महत्व देऊ नये. कारण हजारो पंजाबींनी आपल्या जीवाचे बलिदान दिले आहे. आम्ही नेहमीच राष्ट्रध्वजाचा सन्मान करतो."

IPL_Entry_Point

विभाग