मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Sasaram Violence : लोकसभा निवडणुकीनंतर दंगेखोरांना उलटे टांगून सरळ करू; गृहमंत्री अमित शहांचा इशारा

Sasaram Violence : लोकसभा निवडणुकीनंतर दंगेखोरांना उलटे टांगून सरळ करू; गृहमंत्री अमित शहांचा इशारा

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Apr 02, 2023 05:18 PM IST

Sasaram Violence : बिहारच्या सासाराममध्ये झालेल्या हिंसाचाराच्या घटनेवरून गृहमंत्री अमित शहांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर टिकास्त्र सोडलं आहे.

HM Amit Shah On Sasaram Violence
HM Amit Shah On Sasaram Violence (Amit Shah Twitter)

HM Amit Shah On Sasaram Violence : रामनवमीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये हिंसाचार झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यात महाराष्ट्र, मध्यप्रदेश, दिल्ली, उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि बिहारचा समावेश आहे. त्यानंतर आता देशातील या हिंसाचारांच्या घटनांवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी प्रतिक्रिया देत दंगलखोरांवर कारवाईचा इशारा दिला आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर आम्ही दंगलखोरांना उलटं टांगून सरळ करू, असं वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं आहे. बिहारमधील सासाराम येथे झालेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर अमित शहा यांनी नवादा जिल्ह्याचा दौरा केला आहे. त्यावेळी त्यांनी सासाराममधील घटनेवरून मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

बिहारच्या नवादा जिल्ह्यातील एका कार्यक्रमात बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर बिहारमधील महाआघाडीचं सरकार कोसळणार आहे. त्यानंतर भाजपची सत्ता आल्यास आम्ही दंगलखोरांना उलटे टांगून सरळ करू, असं म्हणत गृहमंत्री अमित शहांनी दंगलखोरांवर थेट कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. याशिवाय भारतीय जनता पार्टी वोट बँकेचं राजकारण करत नाही. आमच्या शासनकाळात कुठेही दंगली होत नाही, असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

बिहारमध्ये ज्या ठिकाणी हिंसाचार झाला त्या सासाराम जिल्ह्यामध्ये जाण्याची माझी इच्छा होती. परंतु दुर्दैवानं तिथं लोकांना मारलं जात आहे. गोळीबार केला जात असल्यामुळं मी तिथं जाऊ शकलो नाही. परंतु भाजपची सत्ता आल्यास दंगलखोरांना उलटं टांगून सरळ केलं जाईल, असं अमित शहा यांनी म्हटलं आहे. याशिवाय सासाराम येथील हिंसाचारग्रस्त भागांत जाता न आल्यामुळं अमित शहांनी माफी मागितली आहे. त्यानंतर पुढील काही दिवसांत सासाराममध्ये जाणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

IPL_Entry_Point