Agniveer Update : अग्निवीर योजनेत सुधारणा करण्यासाठी केंद्र सरकार उपाययोजनांचा विचार करत आहे. यासंदर्भात संरक्षण मंत्रालयाने तिन्ही सैन्यप्रमुखांना भरती करण्यात आलेल्या अग्निवीरांपैकी २५ टक्क्यांहून अधिक जवानांना कायम स्वरूपी करण्यास मत मागीतलं आहे. तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख लवकरच यासंदर्भात त्यांचा अहवाल हा केंद्र सरकारला सादर करणार आहेत. कोरोना काळात लष्करात भरती न झाल्याने तिन्ही सैन्यातील सैनिकांची पदे रिक्त असल्याने येत्या काळात २५ टक्क्यांहून अधिक अग्निवीरांना कायम स्वरूपी केलंजाऊ शकतं, अस सूत्रांचं म्हणणं आहे.
केंद्र सरकारने २०२२ मध्ये अग्निवीर योजना सुरू केली होती, त्याअंतर्गत तिन्ही दलांमध्ये चार वर्षांसाठी अग्निवीरांची भरती करण्याची योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेला मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात आला होता. दरम्यान, सध्या सरकार या योजनेत काही बदल करण्याच्या मानसिकतेत आहेत. या बाबत चाचपणी सुरू आहे.
मात्र, या प्रकरणी तिन्ही दलांमध्ये अजूनही चर्चा सुरू आहे. सध्या तिन्ही दलात रिक्त पदांच्या आधारे अग्निवीरांना कायम करण्याच्या विचारात सरकार आहे. याबाबत हवाई दलप्रमुख एपी सिंह यांना विचारले असता ते म्हणाले की, सरकारने तिन्ही दलांना याबाबत विचारणा केली आहे. याबाबत चर्चा सुरू असून लवकरच आम्ही आमचा अहवाल सरकारला सादर करू.
केंद्र सरकारने २०२२ मध्ये अग्निपथ योजना सुरू केली होती, त्याअंतर्गत तिन्ही दलांमध्ये चार वर्षांसाठी अग्निवीरांची भरती करण्याची योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत चार वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर जास्तीत जास्त २५ टक्के अग्निवीरांना कायम स्वरूपी करण्यात येणार आहे. त्यासाठी त्यांना स्वतंत्रपणे परीक्षा उत्तीर्ण करावी लागणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून तिन्ही सैन्यात सातत्याने अग्निवीरांची भरती केली जात आहे. आतापर्यंत तिन्ही सैन्यात ५० हजारांहून अधिक अग्निवीरांची भरती करण्यात आली आहे.
या योजनेवरून विरोधक सातत्याने सरकारवर टीका केली आहे. त्यामुळे या योजनेत सुधारणा करण्यासाठी सरकारवर दबाव तयार झाला आहे. दरम्यान, संरक्षण मंत्रालयाने देखील या मुद्द्यावर तिन्ही दलांशी चर्चा सुरू केली आहे. अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीला २०२६ मध्ये कार्यमुक्त केले जाणार असल्याने अग्निवीरांच्या धोरणात बदल करण्यासाठी सरकारकडे पुरेसा वेळ आहे.
संबंधित बातम्या