Dr Manmohan Singh passes Away : माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांचे गुरुवारी वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. प्रकृती खालावल्याने गुरुवारी संध्याकाळी त्यांना गंभीर अवस्थेत दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे देशात सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह हे दोन वेळाचे देशाचे पंतप्रधान राहिले आहे. त्यांनी २००४ ते २०१४ या १० वर्षात देशाचं नेतृत्व केलं. त्यांनी १९९१ मध्ये केलेल्या आर्थिक सुधारणांमुळे देशाची आर्थिक प्रगती झाली. देशाच्या अर्थव्यवस्थेतील ऐतिहासिक बदलांसाठी ते कायम झटत राहिले. डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनाची बातमी समजताच राजकीय, सामाजिक, कला, क्रिडा, साहित्य क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात असून त्यांच्या निधनानंतर भारतात सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.
मनमोहन सिंह यांचा जन्म २६ सप्टेंबर १९३२ रोजी अखंड भारतातील पंजाब प्रांतातील गाह गावात झाला. फाळणीनंतर त्यांचे कुटुंब भारतात स्थायिक झाले. तो लहानपणापासून हुशार विद्यार्थी होते. पंजाब विद्यापीठातून पदवी चे शिक्षण पूर्ण करून पुढील शिक्षणासाठी केंब्रिज व ऑक्सफर्ड विद्यापीठात गेले.
काँग्रेसपक्षाने देखील डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे पक्षाचे सर्व कार्यक्रम रद्द केले आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना आदरांजली वाहण्यासाठी काँग्रेसने आपले सर्व शासकीय कार्यक्रम सात दिवसांसाठी रद्द केले आहेत. काँग्रेसचे सरचिटणीस (संघटन) केसी वेणुगोपाल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर पोस्ट केले की, दिवंगत माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना आदरांजली वाहण्यासाठी काँग्रेस पक्षाचे सर्व अधिकृत कार्यक्रम पुढील सात दिवसांसाठी रद्द करण्यात आले आहेत.
मनमोहन सिंह यांनी १९५० च्या दशकात आर्थिक घडामोडींचे संशोधक म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांच्या उल्लेखनीय योगदानामुळे १९७१ मध्ये त्यांची भारत सरकारच्या आर्थिक सल्लागार पदावर नियुक्ती झाली. त्यानंतर त्यांनी नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष आणि रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणूनही काम पाहिले.
१९९१ मध्ये भारत गंभीर आर्थिक संकटातून जात असताना डॉ. मनमोहन सिंह यांची अर्थमंत्री पदी नियुक्ती करण्यात आली. भारताला आर्थिक उदारीकरणाच्या मार्गावर नेणाऱ्या ऐतिहासिक आर्थिक सुधारणा त्यांनी घडवून आणल्या. त्यांच्या नेतृत्वाखाली अर्थव्यवस्थेच्या अनेक क्षेत्रात परकीय गुंतवणुकीची दारे खुली झाली आणि आर्थिक विकासाला गती मिळाली.
संबंधित बातम्या