Kumbh Stampede : महाकुंभातील दुसरा आणि सर्वात मोठा उत्सव मौनी अमावस्येनिमित्त मंगळवारी रात्री दीडच्या सुमारास संगम नोज येथे चेंगराचेंगरी झाली. या घटनेत ९० भाविकांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यातील ३० जणांचा मृत्यू झाला. यातील २५ जणांची ओळख पटली आहे, तर पाच जणांची अद्याप ओळख पटलेली नाही. डीआयजी वैभव कृष्णा आणि मेल ऑफिसर विजय किरण आनंद यांनी बुधवारी रात्री उशिरा घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. दरम्यान, ही दुर्घटना नेमकी कशी घडली याची पाच प्रमुख कारणं समोर आली आहेत.
महाकुंभाच्या पहिल्या दिवसापासून आतापर्यंत दररोज सर्वसामान्य माघ मेळ्यांच्या मकरसंक्रांत किंवा वसंत पंचमीसारखे वातावरण होते. या महाकुंभात अमृतस्नानासाठी कोट्यवधी भाविक प्रयागराजला येणार हे जवळपास निश्चित होते. प्रशासनानेच ८ ते १० कोटी भाविकांच्या आगमनाचा अंदाज व्यक्त केला होता. दरम्यान, ही संख्या लक्षात घेऊन त्यांची व्यवस्था मोठ्या प्रमाणात करणे गरजेचे होते. पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी सज्ज असल्याचा दावा करत होते, मात्र थोड्याशा चुकीमुळे हा अपघात घडला.
गर्दी वर नियंत्रण ठेवण्यासाठी ८४ होल्डिंग एरिया तयार करण्यात आले होते. मात्र, या भागाचा वापर झाला नाही. काली मार्ग पार्किंग व इतर ठिकाणी मंगळवारी रात्री भाविक बसले असता रात्री आठनंतरच त्यांना संगमाच्या दिशेने पाठविण्यास सुरुवात करण्यात आली. त्यामुळे अमृतस्नानासाठी बसलेले भाविक रात्री नऊ वाजल्यापासून संगमावर जमण्यास सुरुवात झाली. मोठ्या प्रमाणात नागरिक एकाच ठिकाणी जमल्याने मोठी गर्दी झाली. यामुळे ही चेंगराचेंगरी झाली.
संगमावर येण्यासाठी व बाहेर जाण्यासाठी करण्यात आलेले नियोजन देखील फसल्याचे आढळले. काली रोडवरून त्रिवेणी धरण ओलांडून भाविक संगम अप्पर रोडवरून संगम नोजला जातील आणि अक्षयवट मार्गावरून त्रिवेणी धरणातून त्रिवेणी मार्गातून बाहेर पडणार असे नियोजन प्रशासनाने केले होते. पण ते नियोजन फसल्याचे असल्याचे दिसून आले. अक्षयवट मार्गावर फार कमी लोक गेले. संगम अप्पर रोडवर लोकांची मोठी गर्दी होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात भाविक एकाच ठिकाणी आले आणि ही दुर्घटना घडली.
भाविकांच्या येण्याजाण्यासाठी संगमस्थळावर तब्बल ३० पांटून पूल बांधण्यात आले होते. परंतु यातील १२ ते १३ पूल नेहमीच बंद ठेवण्यात आले होते. झुंसीहून संगम पर्यंत अनेक किलोमीटर भाविकांना चालत जावे लागते. यामुळे चालून थकलेले भाविक हे संगम नाकावर बराच वेळ बसून राहत होते. यात प्रामुख्याने वयोवृद्ध भविकांचा समावेश आहे. यामुळे संगमावर मोठी गर्दी जमली होती.
रस्त्यांचे रुंदीकरण मोठ्या प्रमाणात करण्यात आले. मात्र, हे रस्ते बहुतांश काळ बंद ठेवण्यात आले. त्याचबरोबर प्रमुख रस्त्यांवर बॅरिकेडिंग करण्यात आले. त्यामुळे भाविकांना सतत पायपीट करावी लागत होती. अशा तऱ्हेने लोक कंटाळून संगमाच्या किनाऱ्यावर बसले. त्यामुळे ते लगेच बाहेर पडले नाहीत. यामुळे संगमावर गर्दी झाली होती.
या ठिकाणी मदत व बचाव कार्यासाठी सीआयएसएफ दल तैनात करण्यात आले होते. मात्र, हे दल सेक्टर १० मध्येच थांबवण्यात आले होते. त्यांना नेमून दिलेल्या ठिकाणी ते पोहोचले नाही. सीआयएसएफ ची कंपनी सेक्टर नंबर १० मध्ये तैनात होती. रात्री हा अपघात झाला आणि कंपनीला पाचारण करण्यात आले, तेव्हा या तुकडीला गर्दीमुले सेक्टर ३ पर्यंत पोहोचण्यास बराच वेळ लागला. त्यामुळे परिस्थिती अधिकच बिकट झाली. थोड्याशा चुकीमुळे ही दुर्घटना घडली.
संबंधित बातम्या