शंकराचार्यानंतर राहुल गांधी हे दुसरे व्यक्ती; 'भारत जोडो'बद्दल माजी मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान
आदी शंकराचार्य यांच्यानंतर कन्याकुमारी ते काश्मीर अशी पदयात्रा करणारे राहुल गांधी हे दुसरे व्यक्ती असल्याचं डॉ. फारुख अब्दुल्ला यांनी म्हटलं आहे.
शेकडो वर्षांपूर्वी आदी शंकराचार्य यांनी कन्याकुमारी ते काश्मीर अशी पदयात्रा केली होती. त्यानंतर अशी पदयात्रा करणारे राहुल गांधी हे दुसरे व्यक्ती आहेत, असं मत जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फ्रंस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. फारुख अब्दुल्ला यांनी आज व्यक्त केलं. आदी शंकराचार्यांनी कन्याकुमारी ते काश्मीर पदयात्रा केलेली तेव्हा परिस्थिती वेगळी होती. आजच्या सारखे रस्ते नव्हते. तर चोहीकडे जंगल पसरलेले होते. राहुल गांधी हे देश जोडण्यासाठी ‘भारत जोडो’ पदयात्रा करत असून या यात्रेवर टीका करून विरोध करणारे हे देशाचे शत्रू असल्याचं डॉ. अब्दुल्ला म्हणाले.
राहुल गांधी यांची ‘भारत जोडो’ यात्रा सध्या जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशात आज दाखल झाली. जम्मूमधील कठुआ येथे राहुल गांधी यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली होती. यावेळी प्रदेश कॉंग्रेसच्या नेत्यांसह नॅशनल कॉन्फ्रंसचे डॉ. फारुख अब्दुल्ला आणि इतर विविध पक्षाच्या नेत्यांनी राहुल गांधीं आणि त्यांच्या सोबत आलेल्या यात्रेकरूंचं स्वागत केलं.
राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत आज, शुक्रवारी शिवसेना खासदार संजय राऊत खास सहभागी झाले होते. शिवाय या यात्रेत अनेक निवृत्त लष्करी अधिकारी सामिल झाले होते. येत्या ३० जानेवारी रोजी राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा ही जम्मू काश्मीरची राजधानी श्रीनगर येथे पोहचणार असून पक्ष कार्यालयात तिरंगा फडकवून या ३,५७० किमी यात्रेचे समापन होणार आहे. देशात वाढता जातीय विद्वेष, बेरोजगारी तसेच महागाईविरोधात राहुल गांधी यांनी ७ सप्टेंबर २०२२ रोजी कन्याकुमारी येथून आपल्या पदयात्रेला प्रारंभ केला होता.