Manmohan Singh Dies At 92: देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचे गुरुवारी रात्री निधन झाले. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने संपूर्ण देशात शोकाकूल वातावरण निर्माण झाले असून केंद्र सरकारने सात दिवसांची शासकीय सुट्टी जाहीर केली आहे. सध्या मनमोहन सिंह यांचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत ते व्हीलचेअरवरून संसदेत हजर झाले होते. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे तोंडभरून कौतूक केले.
नरेंद्र मोदी यांनी संसदेत अनेकदा मनमोहन सिंह यांचे कौतुक केले. ‘मनमोहन सिंह यांचा मी विशेष उल्लेख करू इच्छितो. सभागृह नेते आणि विरोधी पक्षनेते म्हणून त्यांचे योगदान मोठे आहे' , असे मोदी म्हणाले. याशिवाय, मनमोहन सिंह हे व्हीलचेअरवरून सभागृहात मतदान करण्यासाठी कसे आले होते? याची आठवण करून देत त्यांचे कौतुक केले.
२०१४ मध्ये भाजपचे सरकार स्थापन झाल्यानंतर डॉ. मनमोहन सिंह सार्वजनिक जीवनात क्वचितच दिसले. पंतप्रधान मोदींनी त्यांचे कौतुक करताना म्हटले की, ‘मला आठवते, गेल्या काही दिवसांपूर्वी संसदेत एका विधेयकासाठी मतदान पार पडले. सत्ताधारी पक्षाचा विजय होणार आहे, हे माहीत होते. कारण अंतर खूप मोठे होते. पण तरीही डॉ. मनमोहन सिंह यांनी व्हीलचेअरवर येऊन मतदान केले. एक खासदार आपल्या जबाबदाऱ्यांबाबत किती जागरूक असतो, याचे ते उदाहरण आहे. ते एक प्रेरणादायी उदाहरण आहे. एवढेच नाही तर कधी कधी समिती सदस्यांच्या निवडणुका झाल्या, तेव्हा ते व्हीलचेअरवर बसून मतदानासाठी गेले. ते कोणाला पाठिंबा देण्यासाठी आले होते, हे महत्त्वाचे नाही. ते लोकशाही बळकट करण्यासाठी आले होते, असे मला वाटते.’
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सभागृहात डॉ. मनमोहन सिंह यांना अनेकदा टोला लगावला. याबाबत खुद्द पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, वैचारिक मतभेद, स्लेजिंग हे फार अल्पकालीन होते. त्यांनी दीर्घकाळ देशाला ज्या प्रकारे मार्गदर्शन केले आहे, त्याची चर्चा नेहमीच होईल.
मनमोहन सिंह व्हीलचेअरवरून दिल्ली सेवा विधेयकाला मतदान करण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांची प्रकृती थकलेली दिसत होती. केंद्रीय मंत्र्यांनीही डॉ. मनमोहन सिंह यांचे कौतुक केले. आर्थिक सुधारणांसाठी हा देश त्यांचा सदैव ऋणी राहील. १९९१ मध्ये भारत अर्थिक संकटात असताना मनमोहन सिंह यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेला वळण देण्याचे काम महत्त्वपूर्ण काम केले. त्यांनी देशासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले, जे कधीच विसरता येणार नाहीत.
संबंधित बातम्या