माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली दहा वर्षे तुरुंगवास भोगल्यानंतर अवघ्या सात महिन्यांपूर्वी निर्दोष सुटलेले दिल्ली विद्यापीठाचे माजी प्राध्यापक व मानवाधिकार कार्यकर्ते एन. साईबाबा यांचे शनिवारी हैदराबादेत सरकारी रुग्णालयात निधन झाले. एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली.
साईबाबा यांनी रात्री नऊच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला. पित्ताशयाचा संसर्ग आणि आरोग्याच्या इतर समस्यांमुळे त्यांचे निधन झाले. यावर्षी मार्च मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने साईबाबा यांची माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपातून निर्दोष मुक्तता केली होती.
गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर हैदराबादमधील (निम्स) निजाम इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस रुग्णालयात उपचार सुरू होते. जी एन साईबाबा यांच्या पित्ताशयावर काही दिवसांपूर्वीच शस्त्रक्रिया पार पडली होती. मात्र, या शस्त्रक्रियेनंतर शनिवारी रात्री उशिरा त्यांचं निधन झालं. ते ५७ वर्षांचे होते.
जी एन साईबाबा यांच्या प्रकृती अस्वस्थतेमुळे त्यांना १० दिवसांपूर्वी निम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर पित्ताशयावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र, शनिवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर रात्री ८.३० वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला,
यावर्षी मार्च मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने साईबाबाची जन्मठेपेची शिक्षा रद्द केली होती आणि म्हटले होते की, सरकारी पक्ष संशयापलीकडे आरोप सिद्ध करण्यात अपयशी ठरला आहे. त्यानंतर त्याची नागपूर मध्यवर्ती कारागृहातून सुटका करण्यात आली.
गडचिरोली जिल्ह्यातील कनिष्ठ न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर साईबाबा २०१७ पासून नागपूर मध्यवर्ती कारागृहात बंद होते. ते २०१४ ते २०१६ या काळात तुरुंगात होते आणि नंतर त्यांना जामीन मिळाला.
मार्च २०१७ मध्ये गडचिरोली येथील सत्र न्यायालयाने साईबाबा आणि पत्रकार आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू) विद्यार्थ्यासह पाच जणांना माओवाद्यांशी संबंध आणि देशविरोधी कृत्य केल्याप्रकरणात दोषी ठरवले होते.
मुंबई उच्च न्यायालयाने माजी प्राध्यापक जी.एन. साईबाबा यांची माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपातून ५ मार्च २०२४ रोजी निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. या प्रकरणी साईबाबा यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने साईबाबा यांच्याशिवाय आणखी पाचजणांची निर्दोष मुक्तता केली. त्यातील एकाचा तुरुंगातच मृत्यू झाला होता.
मे २०१४ मध्ये, प्राध्यापक जी.एन. साईबाबा यांना महाराष्ट्र पोलिसांनी त्यांच्या दिल्लीतील घरातून अटक केली होती. त्यानंतर साईबाबांना दिल्ली विद्यापीठाने निलंबित केले होते. गडचिरोली न्यायालयाने साईबाबांना UAPA च्या कलम १३, १८, २० आणि ३९ अंतर्गत दोषी ठरवले होते. प्राध्यापक साईबाबा अपंग आहेत. सुप्रीम कोर्टाच्या हस्तक्षेपानंतर त्यांची प्रकृती खालावल्याच्या कारणावरून जुलै २०१५ मध्ये जामिनावर सुटका झाली होती. मात्र नंतर उच्च न्यायालयाने त्यांचा जामीन रद्द करून त्यांना आत्मसमर्पण करण्यास सांगितले होते.
साईबाबा हे जवळजवळ एक दशकांपासून तुरुंगात होते. त्यांना ९० टक्क्यांपर्यंत अपंगत्व होते. जी. एन. साईबाबा हे दिल्ली विद्यापीठातील आनंद महाविद्यालय येथे इंग्रजी विषयाचे प्राध्यापक म्हणून काम करत होते. त्यांना २०१४ साली महाराष्ट्र पोलिसांनी नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या प्रकरणात अटक केली. तेव्हापासून ते तुरुंगातच होते.
मार्च २०१७ मध्ये साईबाबा यांना UAPA कायद्याअंतर्गत दोषी ठरवून त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यांना नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातील अंधार कोठडीत ठेवण्यात आलं होतं.
संबंधित बातम्या