
Delhi Assembly Election 2025 : दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. आता ८ फेब्रुवारीला मतमोजणीनंतर अरविंद केजरीवाल चौथ्यांदा दिल्लीचे मुख्यमंत्री होणार की अडीच दशकांनंतर भारतीय जनता पक्षा सत्तेचा दुष्काळ संपववून दिल्लीत कमळ फुलवणार हे समजेल. मात्र, बहुतांश एक्झिट पोलमध्ये यंदा दिल्लीत भाजपच सरकार स्थापन करणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्याचवेळी दोन्ही पक्षांमध्ये चुरशीची लढत होईल, असा अंदाज मेटराइजच्या सर्वेक्षणातून व्यक्त करण्यात आला आहे.
या सर्व्हेनुसार भाजप आणि 'आप'मध्ये चुरशीची लढत असून, त्यात भगव्या पक्षाला किंचित आघाडी मिळू शकते. एक्झिट पोलमध्ये भाजपला ३५ ते ४० जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर आम आदमी पक्षाला ३२ ते ३७ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. काँग्रेसला ० ते १ जागा मिळण्याची शक्यता आहे.
या संपूर्ण निवडणुकीत मुस्लीम मतदारांची भूमिका काय असेल, हा मोठा प्रश्न राहिला. २०२० मध्ये झालेल्या दंगलीनंतरच्या पहिल्या विधानसभा निवडणुकीत दिल्लीतील मुस्लीम मतदारांना 'आप' सोडून काँग्रेसमध्ये परतणार का, असा प्रश्न सातत्याने विचारला जात होता. आता या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न मेटराइज सर्वेक्षणातून करण्यात आला आहे. याचे निष्कर्ष थोडे आश्चर्यकारक आहेत.
या सर्व्हेनुसार मुस्लिम मतदारांनी काँग्रेसपेक्षा भाजपवर जास्त विश्वास ठेवला आहे. एक्झिट पोलनुसार ६७ टक्के मुस्लिमांनी आम आदमी पक्षाला मतदान केले. त्यामुळे ९ टक्के मतदारांनी काँग्रेसला पसंती दिली. तर ११ टक्के मुस्लिमांनी यावेळी भाजपला दिल्लीत आणण्यासाठी कमळाचे बटण दाबले आहे. इतरांना १३ टक्के मुस्लीम मते मिळण्याची शक्यता आहे.
मुस्लिमांची भाजपशी जवळीक वाढत आहे का?
अशा परिस्थितीत मुस्लिम भाजपच्या अधिक जवळ येत आहेत का, असा प्रश्न पुन्हा उपस्थित होत आहे. गेल्या काही निवडणुकांमध्येही हे दिसून आले आहे. अलीकडच्या काळात भाजपने अनेक मुस्लीमबहुल जागा जिंकल्या आहेत, तर अनेक निवडणूकोत्तर सर्वेक्षणांमध्येही मोठ्या संख्येने मुस्लिमांनी भाजपला मतदान केल्याचे समोर आले आहे. तिहेरी तलाकविरोधी कायद्यामुळे मुस्लीम महिला भाजपला मतदान करू लागल्याचे मानले जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही व्यासपीठावरून अनेकदा याचा उल्लेख केला आहे.
संबंधित बातम्या
