एका कार अपघातात तरुण-तरुणीचा मृत्यू झाला. हे प्रेमीयुगुल तीन वर्षापासून एकमेकांना डेट करत होते आणि लवकरच बोहल्यावर चढणार होते. मात्र त्यापूर्वीच त्यांना जगाचा निरोप घ्यावा लागला. मात्र दोघांच्या कुटूंबीयांनी त्याच्या स्मरणार्थ भूत विवाहाचे आयोजन केले. लग्नाच्या मंडपात दोघांचा एकत्रित असलेला फोटो ठेवण्यात आला. कुटूंबीयांनी म्हटले की, त्यांची इच्छा होती की, एकमेकांसोबत रहावे. आम्ही दोघांची अंतिम इच्छा पूर्ण केली आहे.
साउथ चायना मॉर्निंग पोस्ट वृत्तपत्रात छापलेल्या वृत्तानुसार मलेशियामध्ये राहणारे यांग जिंगशान आणि ली ज़ुएयिंग तीन वर्षाहून अधिक काळापासून एकमेकांना डेट करत होते. दोघांचे लग्नही ठरलं होतं. यांग जिंगशान याने २ जून २०२४ रोजी बँकॉक शहरात आपला वाढदिवस साजरा करण्याचे नियोजन केले होते. हा वाढदिवस त्याच्यासाठी विशेष होता कारण त्याने यादिवशी आपल्या प्रेयसीसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवण्याचा विचार केला होता. मात्र नियतीच्या मनात काही दुसरेच होते. दोघांचाही २४ मे रोजी एक कार अपघातात मृत्यू झाला. हा अपघात उत्तर-पश्चिम मलेशियामधील पेराक शहरात झाला. कार पलटल्याने त्यात दोघांचा मृत्यू झाला. कारमध्ये अन्य लोकही होते. या अपघातात कोणीच जिवंत राहिले नाही.
दोघांच्या स्मरणार्थ भूत विवाह -
या जोडप्याचा अकाली मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटूंबाला मोठा धक्का बसला होता. मात्र त्यांनी 'भूत विवाह' साजरा करून घरात उत्साही वातावरण ठेवण्याचा प्रयत्न केला. मंडपात या अनोख्या लग्नाचे आयोजन केले गेले. त्यांनी दोघांचा फोटो ठेवला. त्यांनी लग्नासाठी दोघांचे खास फोटो तयार करून घेतले होते.
काय आहे भूत विवाह -
चीनमध्ये ‘भूत विवाह’ सामान्यपणे मृत व्यक्तिसाठी साथीदार शोधणे असतो. पारंपरिक चीनी मान्यतेनुसार जर लोक आपल्या इच्छा पूर्ण न करताच मृत्यू पावले तर असा विवाह केला जातो. जसे की, लग्न न करताच मृत्यू झाल्यास लोकांचे मानणे आहे की, त्यांच्या आत्म्याला शांती लाभत नाही. त्यामुळे ते जिवंत लोकांना त्रास देत असतात. त्यामुळे अशा विवाहांचे आयोजन केले जाते.
चीनमध्ये भूत विवाह दोन प्रकारचे असतात. पहिल्या प्रकारात जोडप्याचा साखरपुडा झालानंतर किंवा लग्न ठरल्यानंतर मरतात. त्यांचे शोकाकुल कुटूंबीय प्रेम आणि त्यांच्या आठवणीत विवाह समारंभाचे आयोजन करतात आणि त्यांना एकत्रच दफन केले जाते. दुसऱ्या प्रकारचा भूत विवाह तो आहे, ज्यामध्ये व्यक्ति जिवंत असताना त्याचा विवाह झाला नसेल तर मरणोत्तर त्याचा विवाह केला जातो.
संबंधित बातम्या