Odisha Accident: राष्ट्रपती, पंतप्रधान व राहुल गांधींकडून शोक व्यक्त, मृतांच्या वारसांना १० लाख, गंभीर जखमींना २ लाख
Coromandel express accident : ओडिशातील या रेल्वे अपघातातील मृत प्रवाशांच्या वारसांना आणि जखमींसाठी केंद्रीय रेल्वेमंत्रीअश्विनी वैष्णवयांनी मोठी मदत जाहीर केली आहे.
ओडिशातील बालासोर येथे रेल्वेचा भीषण अपघात झाला असून त्यात आतापर्यंत ५० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर २०० जण गंभीर जखमी झाल्याचंवृत्त आहे. स्थानिक प्रशासन आणि एनडीआरएफची टीम संयुक्तपणे बचावकार्य करत आहे. अपघात स्थळावरील दृष्य अंगावर काटा आणणारं आहे. दरम्यान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे.
ओडिशातील या रेल्वे अपघातातील मृत प्रवाशांच्या वारसांना आणि जखमींसाठी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मोठी मदत जाहीर केली आहे. या अपघातात मृत्यू झालेल्यांच्या वारसांना १० लाख रुपये, गंभीर जखमींसाठी २ लाख आणि किरकोळ जखमींसाठी ५० हजार रुपये मदत सरकारने जाहीर केले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अपघातात जखमी झालेल्या अंदाजे २०० प्रवाशांना सोरो सीएचसी, गोपाळपूर सीएचसी आणि खंटापाडा पीएचसीमध्ये दाखल करण्यात आले आहे. सध्या या मार्गावरील सर्व गाड्या थांबवण्यात आल्या आहेत. याशिवाय ३२ जणांची एनडीआरएफ टीम बचावासाठी पाठवण्यात आली आहे.
दुसरीकडे, ओडिशाचे मुख्य सचिव प्रदीप जेना यांनी सांगितले की लोकांना नेण्यासाठी सुमारे ५० रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या आहेत, परंतु जखमींची संख्या खूप जास्त आहे. त्यामुळे जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी मोठ्या प्रमाणात बसेस बोलावण्यात आल्या आहेत
हावडा ते चेन्नई धावणाऱ्या कोरोमंडल एक्सप्रेस रेल्वेचा शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास मोठा अपघात झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार ओडिशा राज्यातील बालासोर पासून जवळपास ४० किलोमीटर अंतरावर हा अपघात झाला. कोरोमंडल ट्रेन एका मालगाडीला धडकली. मालगाडीला धडकल्यानंतर स्लीपरचे ३ कोच सोडून अन्य डबे रुळावरून खाली उतरले. प्राथमिक माहितीनुसार एक्सप्रेसचे १८ डबे रुळावरून घसरले.
विभाग