हरयाणा विधानसभा निवडणुकीत भाजपने विजय मिळवत सत्तेची हॅट्ट्रीक साधली आहे. खूपच प्रतिकूल परिस्थितीत भाजपने हरयाणाचा विजय खेचून आणला आहे. सर्वच एक्झिट पोलचे अंदाज फोल ठरवत भाजपने सत्ता तिसऱ्यांदा राखली आहे. दरम्यान, या पराभवाबाबत आता काँग्रेसकडून भाष्य करण्यात आलं आहे.
यावेळी हरयाणात काँग्रेस १० वर्षानंतर सत्तेत येणार,असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र मतमोजणीत काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. या निवडणुकीत भाजपाने जोरदार मुसंडी मारत बहुमताचा आकडा पार केला आहे.
काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांनी या निकालावर काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली आहे. हरियाणातील निकाल हा पूर्णपणे अनपेक्षित आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. तसेच एका वाक्यात या निवडणुकीचं विश्लेषण करायचं झाल्यास, हा व्यवस्थेचा विजय असून लोकशाहीचा पराभव आहे. हा निकाल आम्हाला मान्य नाही, असेही ते म्हणाले.
पवन खेरा म्हणाले की, भाजपाकडून ईव्हीएममध्ये छेडछाड करण्यात आला आहे. हिसार, महेंद्रगड आणि पानिपत जिल्ह्यांमधून आमच्याकडे तक्रारी आल्या आहेत. काही ठिकाणी ईव्हीएमची बॅटरी ९९ टक्के असल्याचे आमच्या उमेदवारांनी सांगितलं आहे. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी ईव्हीएमची बॅटरी ९९ टक्के आहे, त्या जागांवर काँग्रेसचा पराभव झाला आहे. ज्या ईव्हीएमच्या तक्रारी नाहीत, त्यांच्या बॅटरी ६० ते ७० टक्के आहेत, असं काँग्रेसच्या उमेदवारांकडून सांगण्यात येत असल्याचं, पवन खेरा यांनी सांगितलं. तसेच या सर्व तक्रारी घेऊन आम्ही निवडणूक आयोगाकडे जाणार आहोत.
हरियाणाचा निकाल पूर्णपणे अनपेक्षित,आश्चर्यकारक आणि वास्तवाविरुद्ध असल्याचं जयराम रमेश म्हणाले. हरियाणातील लोकांनी राज्यात राजकीय परिवर्तन करण्यासाठी आपलं मन बनवलं होतं. आजचा निकाल त्याविरुद्ध आहे. त्यामुळे या परिस्थितीत आज जाहीर झालेले निकाल स्वीकारणे आम्हाला शक्य नसल्याचं रमेश म्हणाले
दरम्यान, हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजपाने ४८ जागा मिळवून स्पष्ट बहुमत मिळवले आहे. काँग्रेसने ३७ जागांवर विजय मिळवला आहे. याशिवाय भारतीय लोकदल पक्षाने २ तर अपक्षांना ३ जागांवर विजय मिळाला आहे.
संबंधित बातम्या