मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Lok Sabha Election 2024 : देशातील ४५० लोकसभा मतदारसंघांत भाजपविरुद्ध एकच उमेदवार; काँग्रेसचा मोठा प्लान

Lok Sabha Election 2024 : देशातील ४५० लोकसभा मतदारसंघांत भाजपविरुद्ध एकच उमेदवार; काँग्रेसचा मोठा प्लान

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
May 30, 2023 06:26 PM IST

Congress for Opposition unity : २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा विजयरथ रोखण्यासाठी काँग्रेस सरसावली आहे.

Rahul Gandhi - Narendra Modi
Rahul Gandhi - Narendra Modi

Congress for Opposition unity : कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर काँग्रेसचा आत्मविश्वास वाढला असून पक्षानं लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. मोदी सरकारला रोखण्यासाठी काँग्रेसनं काही प्रमाणात लवचिक होण्याचेही संकेत दिले आहेत. मित्रपक्षांकडं सहकार्याचा हात पुढं करताना काँग्रेसनं देशभरातील ४५० लोकसभा मतदारसंघात एकास एक उमेदवार देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी अवघे एक वर्ष बाकी आहे. त्यामुळं सर्वच पक्षांनी आपापली रणनीती आखायला सुरुवात केली आहे. भाजपविरोधात विरोधकांची एकजूट करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. नितीशकुमार यांनी त्यासाठी पुढाकार घेतला असून ते प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांच्या गाठीभेटी घेत आहेत. मागील दोन निवडणुकांमध्ये दारुण पराभव पत्करलेल्या काँग्रेसनं यावेळी नरमाईचं धोरण स्वीकारलं असून छोट्या पक्षांशी सहकार्याची भूमिका घेतल्याचं सध्याचं चित्र आहे.

Modi Govt's 9 Years: 'देशाच्या नाकी नऊ आणणारे नऊ वर्ष'

काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी अलीकडंच नव्या रणनीतीचं सुतोवाच केलं आहे. विरोधी पक्ष एकत्र आल्यास भाजपच्या विरोधात ४५० जागांवर एकच संयुक्त उमेदवार दिला जाईल, असं त्यांनी म्हटलं आहे. चिदंबरम यांच्या या विधानाशी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सहमती दर्शवली आहे. मात्र, अन्य राजकीय पक्षांनी अद्याप फारसा प्रतिसाद दिलेला नाही. येत्या १२ जून रोजी नितीश कुमार यांनी बिहारची राजधानी पाटणा इथं विरोधी पक्षाच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे देखील बैठकीला उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.

काय आहे प्लान?

देशात सध्या भाजपचे ३०० हून अधिक खासदार आहेत. या जागांसह अन्य जवळपास १५० जागा मिळून सुमारे ४५० जागांवर एकास एक उमेदवार उतरवण्याची कल्पना चिदंबरम यांनी मांडली आहे. मतविभाजनामुळं भाजपला मोठा फायदा होत असल्याचं आतापर्यंत दिसून आलं आहे. हे मत विभाजन टळल्यास भाजपचा वारू रोखला जाऊ शकतो, असं काँग्रेसला वाटतं. स्वत:च्या राज्यात वर्चस्व राखून असलेल्या ममता बॅनर्जी, अखिलेश यादव यांची या प्रस्तावाला कितपत साथ मिळते हे पाहावं लागेल. हा फॉर्मुला प्रत्यक्षात आणायचा झाल्यास काँग्रेसला मोठा त्याग करावा लागू शकतो. ती तयारी काँग्रेस दाखवतं का यावरही बरंच काही अवलंबून असणार आहे.

IPL_Entry_Point

विभाग