हिमाचल प्रदेश विधानसभेत कॉंग्रेस पक्षाला स्पष्ट बहुमत असूनही आज पार पडलेल्या राज्यसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवार अभिषेक मनू सिंघवी यांना लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला. अटीतटीच्या झालेल्या राज्यसभा निवडणुकीत भाजप उमेदवार हर्ष महाजन यांचा विजय झाला आहे. हिमाचल प्रदेशात कॉंग्रेस सत्तेत असूनही अधिकृत उमेदवाराचा पराभव झाल्यामुळे भारतीय जनता पक्षाने हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुक्खू यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
‘कॉंग्रेस पक्षाच्या आमदारांनी वर्षभरातच पक्षाला सोडून दिले आहे. आजचा विजय पाहता हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा’ अशी मागणी हिमाचल प्रदेशचे विरोधी पक्षनेते जयराम ठाकूर यांनी केली आहे. ठाकूर यांनी हिमाचल प्रदेशातून विजयी झालेले भाजपचे राज्यसभा उमेदवार हर्ष महाजन यांचे अभिनंदन केले आहे. राज्यात कॉंग्रेस पक्ष सत्तेत असूनही राज्यसभेची जागा गमवण्याची नामुष्की ओढवल्यामुळे विरोधी पक्षांनी टीकेची झोड उठवली आहे.
हिमाचल प्रदेशात राज्यसभेच्या एका जागेसाठी आज निवडणूक झाली. कॉंग्रेसकडून प्रख्यात कायदेतज्ञ अभिषेक मनू सिंघवी हे मैदानात होते. तर भाजपकडून हर्ष महाजन यांनी निवडणूक लढवली. या निवडणुकीत कॉंग्रेस आमदारांना भाजपकडून धमकवण्यात येत असल्याचा आरोप मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांनी मतदानापूर्वी केला होता. या निवडणुकीत एकूण ९ आमदारांनी क्रॉस वोटिंग केल्याचं मुख्यमंत्री सुक्खू म्हणाले. यात तीन अपक्ष आमदार होते. तर ६ कॉंग्रेस आमदारांनी आपलं इमान विकून भाजपला मतदान केलं असल्याचं सुखविंदर सुक्खू म्हणाले. कॉंग्रेस आमदारांनी असं का केलं, याबाबत त्यांचे कुटुंबीय स्तब्ध असून हिमाचल प्रदेशात यापूर्वी असं कधीही घडलं नव्हतं. ही हिमाचल प्रदेशची संस्कृती नसल्याचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू म्हणाले.
कॉंग्रेसचा अधिकृत उमेदवार राज्यसभा निवडणुकीत पराभूत झाल्याने आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्ष अविश्वास ठराव मांडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, कॉंग्रेस उमेदवार अभिषेक मनू सिंघवी यांनी भाजपचे विजयी उमेदवार हर्ष महाजन यांचं अभिनंदन केलं.
दरम्यान, हिमाचल प्रदेशात भाजप सत्तेत नसतानाही आमचा राज्यसभेचा उमेदवार निवडून आला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा हेच या विजयाचे शिल्पकार असल्याची प्रतिक्रिया हिमाचल प्रदेशमधील भाजप नेते जयराम ठाकूर यांनी दिली आहे.
संबंधित बातम्या