मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  ‘हिटलरच्या मार्गाने जाल तर त्याच्यासारखेच मराल’ काँग्रेस नेत्याचे वादगस्त विधान

‘हिटलरच्या मार्गाने जाल तर त्याच्यासारखेच मराल’ काँग्रेस नेत्याचे वादगस्त विधान

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jun 20, 2022 05:11 PM IST

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुबोध कांत सहाय यांनी पंतप्रधानांवर टीका केली आहे ‘मोदी हिटलरच्या वाटेवर चालले तर हिटलरप्रमाणे त्यांचाही मृत्यू होईल’, असं वादग्रस्त विधान सहाय यांनी केलं आहे.

काँग्रेस नेत्याचे मोदींबाबत वादगस्त विधान
काँग्रेस नेत्याचे मोदींबाबत वादगस्त विधान

अग्निपथ योजना आणि राहुल गांधींच्या ईडी चौकशीवरून संतप्त झालेले काँग्रेस नेते सुबोध कांत सहाय यांनी जंतर-मंतर वरील'सत्याग्रह’ मंचावरून पंतप्रधान मोदींबाबत वादग्रस्त टिप्पणी केली. झारखंडमधील काँग्रेसचे वरिष्ठ नेते सुबोध कांत यांनी मोदीची तुलना हिटलरशी करत मर्यादा ओलांडली. त्यांनी म्हटले की, पंतप्रधान मोदी हिटलरच्या मार्गाने जात आहेत व त्यांचाही अंत हिटलर प्रमाणेच होईल. सुबोध कांत यांच्या या वक्तव्यावर व्यासपीठावर उपस्थित काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी टाळ्या वाजवून त्यांना दाद दिली.

सुबोध कांत सहाय म्हणाले की, गेले १० दिवस आम्ही संघर्षाचा सामना करत आहोत. गेल्या १३५ वर्षांचा इतिहास मोदींना माहीत नाही, पण आपण कोणती परंपरा पाळतो हे काँग्रेसच्या लोकांना माहीत असल्याचे सहाय म्हणाले. तसेच राहुल गांधी यांच्या अंगात दम आहे. सरकारच्या डोळ्यात डोळे घालून जर कोणी बोलू शकतं ते राहुल गांधी असल्याचे सहाय म्हणाले.

अग्निपथ योजनेविरोधात देशात तीव्र विरोध करण्यात येत आहे. देशात अनेक ठिकाणी हिंसक आंदोलने करण्यात येत आहे. योजना मागे घेण्यात यावी यासाठी केंद्र सरकारवर विविध मार्गांनी दबाब टाण्यात येत आहे. मात्र, केंद्र सरकार आपल्या निर्णयावर ठाम आहे. तर दुसरीकडे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुबोध कांत सहाय यांनी पंतप्रधानांवर टीका केली आहे ‘मोदी हिटलरच्या वाटेवर चालले तर हिटलरप्रमाणे त्यांचाही मृत्यू होईल’, असं वादग्रस्त विधान सहाय यांनी केलं आहे.

मदारीच्या रुपाने आलेले मोदी हुकूमशाह -

सुबोध कांत सहाय म्हणाले झारखंडमध्ये आमचे युतीचे सरकार आहे, ते पाडण्यासाठी ईडीचे दीड महिन्यांपासून दररोज छापे पडत आहेत. भाजपाने आपली २-३ निवडून आलेली सरकारे कशी पाडली हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. मदारीच्या रूपाने या देशात आलेले मोदी पूर्णत: हुकूमशाही चालवत असल्याची टीका सहाय यांनी केली. तसेच काँग्रेस हा हुतात्म्यांचा पक्ष असून काँग्रेसने कधीच लक्ष्मणरेषा ओलांडली नसल्याचेही सहाय म्हणाले.

WhatsApp channel