google map problem : गुगल मॅपने पुन्हा एकदा प्रवाशांचा विश्वासघात केल्याची घटना उघडक झाली आहे. बरेलीतील काही तरुण हे धुक्यामुळे गुगल मॅपचा आधार घेऊन पीलीभीतच्या दिशेने जात होते. यावेळी गूगलमॅपने रस्ता शोधत शॉर्टकटने जात असतांना त्यांची कार कालव्यात कोसळली. या घटनेत सुदैवाने कोणालाही इजा झाली नाही. मात्र, कारचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत क्रेन मागवून कार कालव्या बाहेर काढली. यापूर्वी २४ नोव्हेंबर रोजी अर्थवट पुलावरून कार कोसळून तीन तरुणांचा मृत्यू झाला होता.
इज्जतनगरचे इन्स्पेक्टर धनंजय पांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास दिव्यांशू पुत्र महेंद्र प्रताप सिंह हा औरैया येथे राहणारा आपल्या दोन मित्रांसोबत कारने पीलीभीतला जात होता. यावेळी धुके जास्त असल्याने त्यांनी गुगल मॅप लावले होते. इज्जतनगरमधील कलापूर पुलियाजवळ गुगलने शॉर्टकट रस्ता दाखवला. त्यांनी त्या मार्गाने त्यांची कार वळवली. परंतु काही अंतर गेल्यावर बारकापूर तिराहा गावातील रस्ता संपल्यावर त्यांची कार थेट कालव्यात कोसळली. सुदैवाने कालव्यात पाणी नव्हते व गाडीचा वेग जास्त नव्हता, त्यामुळे मोठी दुर्घटना झाली नाही. त्यांनी कार कालव्या बाहेर काढण्याचा प्रयत्न केला पण त्यांना यश आले नाही. यानंतर त्यांनी यूपी पोलिसांना ११२ क्रमांकावर फोन केला. यानंतर पोलीस क्रेनघेऊन आले आणि त्यांनी तरुणांसह त्यांची कार कालव्या बाहेर काढली. या घटनेत तिन्ही तरुण किरकोळ जखमी झाले आहेत.
२४ नोव्हेंबर रोजी फरीदपूरमधील खल्लीपूर येथे अपूर्ण पुलावरून कार कोसळून तीन तरुणांचा मृत्यू झाला होता. हे तिघेही लग्नाला जाणार होते आणि गुगल मॅप पाहून एका अर्थवट काम झालेल्या पूलावरून त्यांनी त्यांची कार वळवली. मात्र, थोड्या दूर गेल्यावर त्यांची कार थेट पुलावरून खाली पडली. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर सहा दिवसांनी बदायूं पोलिसांनी गुगलला नोटीस पाठवली होती. ज्या भागात ही घटना घडली त्या भागातील रिजनल मॅनेजरचे नाव आणि पत्ता ही पोलिसांनी गुगलला पाठवण्यात आला आहे. गुगलकडून उत्तर मिळाल्यानंतर पोलिस याप्रकरणी पुढील कारवाई करणार आहेत.
संबंधित बातम्या