विनेश फोगाट जिथं जाईल, तिथं सत्यानाश होणार! कुस्तीनंतर आता काँग्रेसला बुडवलं - बृजभूषण सिंह
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  विनेश फोगाट जिथं जाईल, तिथं सत्यानाश होणार! कुस्तीनंतर आता काँग्रेसला बुडवलं - बृजभूषण सिंह

विनेश फोगाट जिथं जाईल, तिथं सत्यानाश होणार! कुस्तीनंतर आता काँग्रेसला बुडवलं - बृजभूषण सिंह

Published Oct 08, 2024 05:34 PM IST

Brijbhushan singh reaction on vinesh phogat : हरयाणा विधानसभा निवडणुकीत विनेश फोगाट यांच्या झालेल्या विजयावर भाजपचे माजी खासदार बृजभूषण सिंह यांनी अत्यंत खोचक प्रतिक्रिया दिली आहे.

विनेश फोगाट जिथं जाईल, तिथं सत्यानाश होणार - बृजभूषण सिंह
विनेश फोगाट जिथं जाईल, तिथं सत्यानाश होणार - बृजभूषण सिंह

Brij Bhushan Sharan Singh : हरयाणा विधानसभा निवडणुकीत झालेल्या कुस्तीपटू विनेश फोगाट हिच्या विजयावर भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार बृजभूषण सिंह यांनी अत्यंत खोचक व जळजळीत प्रतिक्रिया दिली आहे. ‘ती जिंकली पण काँग्रेस बुडाली. तिथं जाईल, तिथं सत्यानाश होणार,’ असा दावा बृजभूषण यांनी केला आहे.

ऑलिम्पिक महासंघाचे अध्यक्ष असताना बृजभूषण यांनी महिला कुस्तीपटूंचा लैंगिक छळ केल्याचा आरोप विनेश फोगाटसह अन्य अनेक कुस्तीपटूंनी केला होता. बृजभूषण यांच्यावर कारवाईसाठी कुस्तीपटूंनी जवळपास दोन वर्षे पाठपुरावा केला होता. दिल्लीच्या रस्त्यावर आंदोलनही केलं होतं. त्यामुळं बृजभूषण यांना संघटनेतील पद सोडावं लागलं. त्यामुळं त्यांचा फोगाट हिच्यावर राग आहे.

विनेश फोगाट हिच्या विजयानंतर बृजभूषण यांचा हा राग उफाळून आला. काँग्रेसच्या पराभवाकडं बोट दाखवत त्यांनी विनेश फोगाट हिच्यावर टीका केली. 'कथित पैलवानांनी माझ्या विरोधात केलेल्या आंदोलनामुळं निवडणुकीत भाजपचा पराभव होईल असं लोकांना वाटत होतं, पण 'जाट' बहुल जागांवरही आमचे अनेक उमेदवार विजयी झाले, याकडं त्यांनी लक्ष वेधलं.

'भाजपचे अनेक उमेदवार 'जाट' बहुल मतदारसंघांत विजयी झाले. याचा अर्थ आंदोलन करणारे तथाकथित पैलवान हे हरयाणाचे हिरो नाहीत. ते खलनायक आहेत. सर्व ज्युनिअर कुस्तीपटूंसाठीही ते खलनायक आहेत. कथित पैलवानांनी कुस्तीला बदनाम केलं. खोटं नरेटिव्ह सेट केलं. आंदोलन केलं. त्याचाही परिणाम निवडणुकीत झाला,' असं बृजभूषण म्हणाले.

मी महान आहे!

विनेश फोगाट यांनी जिंकण्यासाठी माझ्या नावाचा वापर केला असं मी ऐकतोय. याचा अर्थ मी एक महान माणूस आहे. माझ्या नावात इतका दम आहे की माझ्यामुळं तिची नैय्या पार झाली. ती जिंकली, पण काँग्रेसला तर बुडवलं ना? हुडा साहेब बुडाले. प्रियंका गांधी बुडाल्या. राहुल बाबांचं काय होणार? त्यांनी हरयाणा जिंकण्याची खूप स्वप्नं रंगवली होती. काय झालं? ही जिथं-जिथं जाईल, सत्यानाशच होणार, अशी टीका बृजभूषण यांनी केली.

हरयाणाच्या जनतेचे मी आभार मानतो!

बृजभूषण सिंह यांनी यावेळी हरयाणाच्या जनतेचे आभार मानले. शेतकरी आणि पैलवानांच्या आंदोलनाच्या नावाखाली हरयाणातील जनतेची दिशाभूल करण्याचे अनेक प्रयत्न करण्यात आले. तरीही तिथल्या जनतेनं भाजपला पुन्हा सत्ता दिली आहे. याबद्दल सगळेच अभिनंदनास पात्र आहेत,' असं बृजभूषण शरण सिंह म्हणाले.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर