'हनुमान चालिसा'मुळं आघाडीच्या लंकेला आग; उमा भारती यांची बोचरी टीका
Uma Bharti on Shiv Sena Revolt: शिवसेनेतील बंडामुळं राज्यातील महाविकास आघाडी सरकार संकटात आल्याचं दिसताच भाजप नेत्या उमा भारती यांनी जोरदार टोला हाणला आहे.
Uma Bharti on Maharashtra Political Crisis: राज्यातील महाविकास आघाडी सरकार संकटात आल्यामुळं भाजपच्या गोटात आनंदाचं वातावरण आहे. माजी केंद्रीय मंत्री व भाजपच्या ज्येष्ठ नेत्या उमा भारती यांनी केलेल्या विधानातून हे स्पष्ट झालं आहे. नवनीत राणा यांच्या हनुमान चालिसा पठणामुळं महाविकास आघाडीच्या लंकेला आग लावली आहे, अशी खोचक टीका उमा भारती यांनी केली आहे.
एकनाथ शिंदे यांचं बंड यशस्वी होत असल्याचं स्पष्ट झाल्यामुळं आता भाजपचे नेते बोलू लागले आहेत. उमा भारती यांनी ट्विटरच्या माध्यमातून राज्यातील आघाडी सरकारवर हल्ला चढवला आहे. 'हे सरकार चालणं शक्यच नव्हतं. या सरकारला कुठलाही वैचारिक आधार नव्हता, असं त्यांनी म्हटलं आहे.
नवनीत राणा यांनी हनुमान चालिसाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारशी केलेल्या संघर्षाचं त्यांनी कौतुक केलं. देवतांशी कधी युद्ध करू नये कारण त्यात नेहमी पराभवच होतो. देवतांच्या शक्तीसमोर कुणीच टिकू शकत नाही. हनुमान हे जगातील सर्व महिलांचे मोठे बंधू आहेत. ते महिलांचे रक्षक आहेत. हनुमान चालिसाच्या पठणानंतर लंकेत आग लागतेच,' असं त्या कोणाचंही नाव न घेता म्हणाल्या.
दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचीही उमा भारती यांनी आठवण काढली. ‘बाळासाहेबांच्या पक्षाची ही पडझड वेदनादायी आहे,’ असं त्या म्हणाल्या.
संबंधित बातम्या