लोकसभा निवडणूक जाहीर होण्याआधीच ‘इंडिया’ आघाडीला धक्क्यांवर धक्के बसत आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी तसेच आपचे पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनीही लोकसभेच्या सर्व जागा स्वबळावर लढवणार असल्याचा दावा केला. त्यातच आता बिहारमध्ये मोठी राजकीय उलथापालथ होण्याची चर्चा सुरू असून बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार पुन्हा यू टर्न घेत भाजपसोबत जाणार असल्याचे बोलले जात आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी व आपनंतर नितीश कुमार वेगळा विचार करण्याच्या तयारीत असल्याने इंडिया आघाडीच्या एकजुटीला तडा गेला आहे. नितीश कुमार पुन्हा ‘एनडीए’ सोबत जाण्याची शक्यता आहे. याला भाजपाकडून मंजुरीही मिळाली असून बिहारची विधानसभा बरखास्त केली जाण्याची शक्यता आहे. दुसरीकडे भाजपने आपल्या सर्व आमदारांना राजधानी पाटण्यात बोलावून घेतलं आहे. त्यामुळे विधानसभा बरखास्त करून सरकारचा नव्याने शपथविधी होण्याची शक्यता आहे.
नितीश कुमारांचा थांबवण्यासाठी राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव तसेच काँग्रेस नेत्यांकडून प्रयत्न सुरू आहेत. मात्र इंडियाच्या मागच्या बैठकीपासून नितीश कुमार आघाडीत नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत.
नितीश कुमार यांनी बुधवारी घराणेशाहीवरून लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबाला अप्रत्यक्षपणे लक्ष्य केलं होतं. त्यानंतर बिहारचं राजकीय वातावरण चांगलं तापलं आहे. नितीश कुमार यांनी म्हटलं होतं की, आजकाल लोक आपल्या कुटुंबाला पुढं आणतात. पण, समाजवादी नेते कर्पुरी ठाकूर यांनी कुटुंबाला कधी पुढं आणलं नाही. त्यांच्याच पाऊलावर पाऊल टाकत आम्ही कुटुंबाला राजकारणात आणलं नाही. कर्पुरी यांच्यानंतर आम्ही त्यांचे पुत्र रामनाथ ठाकूर यांना राजकारणात आणलं. सध्या राष्ट्रीय जनता दल आणि नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेडमध्ये तणाव वाढला आहे.
संबंधित बातम्या