bharat jodo nyay yatra stopped in guwahati : आसाममध्ये काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेत पुन्हा मोठा राडा झाला. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली ही यात्रा गुवाहाटी शहरात प्रवेश करत असतांना पोलिसांनी रोखली. दरम्यान, कॉँग्रेस कार्यकर्ते पुढे जात राहिल्याने तब्बल ५ हजार काँग्रेस कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. यात अनेक कॉँग्रेस कार्यकर्ते हे जखमी झाले आहेत. राहुल गांधींसह अनेक जणांवर विनापरवाना प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आणि गोंधळ घातल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सीएम हिमंता बिस्वा सरमा यांनी डीजीपीशी बोलून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.
कॉँग्रेसची न्याय यात्रा सध्या आसाम येथे आहे. ही यात्रा आज गुवाहाटी येथे जाणार होती. राहुल गांधी यांच्यासह सुमारे ५ हजार कार्यकर्ते हे गुवाहाटी येथे जात होते. यावेळी पोलिसांनी त्यांना रोखले. यामुळे गोंधळ निर्माण झाला. या यात्रेला रोखण्यासाठी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मात्र, कॉँग्रेस कार्यकर्त्यांनी रस्त्यात लावलेले बॅरिकेट तोडून पुढे जात राहिले. यामुळे पोलिसांनी लाठी चार्ज केला. पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमध्ये आसाम प्रदेशाध्यक्ष भूपेन कुमार बोरा आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देबब्रत सैकिया हेही जखमी झाल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. यापूर्वी हिमंता बिस्वा सरमा सरकारने गुवाहाटीच्या मुख्य रस्त्यावरून काँग्रेस यात्रा काढण्यास परवानगी दिली नव्हती. गुवाहाटीमध्ये मंगळवारी कामकाजाचा दिवस असल्याने यात्रेला परवानगी दिल्यास संपूर्ण शहरात ठप्प होईल, असे प्रशासनाने सांगितले.
काँग्रेसने गुवाहाटीच्या मुख्य मार्गाकडे जाण्याऐवजी राष्ट्रीय महामार्गाकडे जावे, असे आसाम सरकारने म्हटले होते. काँग्रेस कार्यकर्त्यांना राष्ट्रीय महामार्ग २७ वरुन जाण्यास सांगण्यात आले होते. हा रस्ता गुवाहाटीचा रिंग रोड आहे. मोर्चात सहभागी काँग्रेस कार्यकर्त्यांनी सांगितले की, प्रशासनाने गुवाहाटीमध्ये प्रवेश करण्यास परवानगी दिली नाही. अशातच मंगळवारी पुन्हा एकदा यात्रेबाबत काँग्रेस आणि भाजपमध्ये यावरून वाद झाला. याआधी सोमवारीही राहुल गांधींना मंदिरात जाण्यापासून रोखण्यात आल्याने वाद निर्माण झाला होता. यानंतर राहुल गांधी आणि जयराम रमेश यांच्यासह सर्व नेते रस्त्यावर बसून रघुपती राघव राजा राम म्हणू लागले होते.
हिमंता बिस्वा सरमा यांचे सरकार राहुल गांधींच्या या यात्रेला घाबरले आहे. त्यामुळेच त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. आसाममध्ये ही यात्रा सुरू झाल्यापासून देशातील सर्वात भ्रष्ट मुख्यमंत्री आमच्या ताफ्यावर सातत्याने हल्ले करत आहेत. यासाठी गुंडांचाही वापर केला जात आहे. राहुल गांधींना आसाममध्ये प्रसिद्ध असलेल्या वैष्णव संत श्रीमंत शंकरदेव यांच्या मंदिरात जायचे होते. मात्र अयोध्येत सुरू असलेल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी राहुल गांधींनी मंदिरात जाण्यापूर्वी रोखण्यात आले.
संबंधित बातम्या