बेंगळुरू-कामाख्या एक्स्प्रेस रविवारी रुळावरून घसरली. ओडिशातील कटक जिल्ह्यात ही दुर्घटना घडली आहे. एसी ट्रेनचे ११ डबे रुळावरून घसरले. एनडीआरएफचे पथक आणि रेल्वेचे अधिकारी मदत आणि बचाव कार्यासाठी घटनास्थळी दाखल झाले आहेत. ओडिशातील कटक जिल्ह्यातील नेरगुंडी स्थानकाजवळ रुळावरून घसरून झालेल्या दुर्घटनेत एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे, तर सात जण जखमी झाले आहेत.
पूर्व किनारपट्टी रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी अशोक कुमार मिश्रा यांनी सांगितले की, एसएमव्हीटी बेंगळुरू-कामाख्या एसी एक्स्प्रेसचे ११ डबे सकाळी ११ वाजून ५४ मिनिटांनी निरगुंडीजवळील मंगळुरी येथे रुळावरून घसरले. घटनास्थळी मदत गाडी रवाना करण्यात आली आहे.
काही जखमी प्रवाशांव्यतिरिक्त आम्हाला एक मृतदेह मिळाला आहे. जखमी प्रवाशांवर उपचार करण्यासाठी डॉक्टरांची तीन पथके कार्यरत आहेत, अशी माहिती एससीबी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे प्रशासकीय अधिकारी सुभाषचंद्र रे यांनी दिली. मृताची ओळख अद्याप पटलेली नाही.
पूर्व किनारपट्टी रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, सकाळी ११.५४ वाजता हा अपघात झाला, परंतु अपघाताचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. सध्या या मार्गावर अडकलेल्या गाड्या वळवण्यावर आणि अपघातस्थळी बाधित प्रवाशांना आवश्यक सुविधा पुरविण्यावर आमचा भर आहे. त्यांना बाहेर काढण्यासाठी विशेष रेल्वेची व्यवस्था करण्यात येणार आहे, अशी माहिती पूर्व किनारपट्टी रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी अशोक कुमार मिश्रा यांनी दिली.
राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) आणि ओडिशा आपत्ती जलद कृती दल (ओडीआरएएफ) पथके आणि रेल्वे वैद्यकीय पथक, आपत्कालीन वैद्यकीय उपकरणांसह अपघात मदत ट्रेन घटनास्थळी दाखल झाली आहे. 'जखमी व वृद्धांना घेऊन जाण्यासाठी स्ट्रेचरचा वापर केला जात आहे. ते विशेष रेल्वेने रवाना होतील, असेही त्यांनी सांगितले.
अग्निशमन दलाचे महासंचालक सुधांशू सारंगी म्हणाले की, योग्य रस्ता नसल्यामुळे घटनास्थळी पोहोचणे आव्हानात्मक होते. अग्निशमन दलाचे १५० जवान घटनास्थळी दाखल झाले असून सर्व प्रवाशांची सुटका करण्यात आली आहे.
ही दुर्घटना डाऊनलाईनवर घडली असल्याने सामान्य रेल्वे सेवा पूर्ववत व्हावी यासाठी दुरुस्तीच्या कामाला आमचे प्राधान्य आहे. रेल्वेचे सर्व ११ एसी डबे रुळावरून घसरले आहेत. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी सविस्तर चौकशी केली जाईल, असे ईसीओआरचे मुख्य जनसंपर्क अधिकारी यांनी सांगितले. या दुर्घटनेमुळे तीन गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत.
रेल्वेकडून पिण्याच्या पाण्याची कोणतीही व्यवस्था करण्यात आली नसल्याचा आरोप रुळावरून उतरलेल्या प्रवाशांनी केला. ओडिशामध्ये वारंवार रेल्वे अपघात का होत आहेत, हे आम्हाला माहित नाही. आम्ही ऐकत आहोत की काही काम सुरू होते आणि ते योग्य प्रकारे केले गेले नाही ज्यामुळे हा अपघात झाला, असे एका प्रवाशाने सांगितले.
संबंधित बातम्या