अयोध्येत येत्या २२ जानेवारीला राम मंदिरात राम लल्लाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना केली जाणार आहे. यासाठी अयोध्येत जय्यत तयारी सुरू असून अनेकांना निमंत्रणे पाठवण्यात आली आहेत. राम मंदिर उद्घाटनाची तारीख जाहीर झाल्यापासून अनेक जण लालकृष्ण अडवाणींचे राम मंदिराच्या लढ्यातील योगदानाचा उल्लेख करत होता. राम मंदिराचे स्वप्न पूर्ण होत असताना या उद्घाटनाला लालकृष्ण आडवाणी येणार नसल्याचे सांगितले जात होते. मात्र आता लालकृष्ण अडवाणी राममंदिर उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याचे स्पष्ट झालं आहे. यादरम्यान आता लालकृष्ण अडवाणी यांची राम मंदिराबाबत पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
लाल कृष्ण आडवाणी यांनी राष्ट्रधर्म या हिंदी मासिकाशी संवाद साधताना भव्य राम मंदिर बांधल्याबद्दल आणि हा संकल्प पूर्ण केल्याबद्दल पंतप्रधान मोदींचे अभिनंदन केले आहे. यावेळी अडवाणी यांनी त्यांच्या रथयात्रेचाही उल्लेख केला आहे. अडवाणी म्हणाले की, अयोध्येत भव्य राम मंदिर होणार, हे नियतीनेच ठरवले होते. रथयात्रा सुरू झाल्यानंतर काही दिवसांनी मला समजले की मी फक्त एक सारथी आहे. हा रथ स्वतःच रथयात्रेचा मुख्य संदेशवाहक आहे.
दरम्यान, अडवाणी यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचीही आठवण काढली आणि प्राण प्रतिष्ठाच्या भव्य कार्यक्रमात त्यांची अनुपस्थिती जाणवत असल्याचे सांगितले.
'श्री राम मंदिर : एक दिव्य स्वप्नाची पूर्तता' या लेखात त्यांनी या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे. हा विशेषांक १५ जानेवारीला प्रकाशित होत आहे. आपल्या रथयात्रेतील अविस्मरणीय क्षणांचं स्मरण करत अडवाणी म्हणाले की, आज रथयात्रेला ३३ वर्षे पूर्ण झाली आहेत. २५सप्टेंबर १९९० रोजी काढलेल्या रथयात्रेत नरेंद्र मोदी अडवाणींचे सहाय्यक होते आणि संपूर्ण रथयात्रेत त्यांच्या सोबत होते. सोमनाथ ते अयोध्येपर्यंत १० राज्यांतून व १० हजार किलोमीटरच्या या रथयात्रेने लोकांमध्ये राम मंदिराची बीज पेरले होते.
आडवाणी म्हणतात की, रथयात्रा सुरु झाल्यानंतर काही दिवसांतच मला हे लक्षात आलं की माझी त्यातली भूमिका फक्त सारथ्य करण्याचीच होती. रथयात्रेचा संदेश हा त्या रथानेच दिला. कारण मंदिर पूर्ण व्हावं यासाठीच ही रथयात्रा काढण्यात आली होती.
संबंधित बातम्या