भाजप आणि काँग्रेसवर टीका करताना एमआयएम प्रमुख ओवैसी यांनी राहुल गांधी व नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना दोघांना राम व शामची जोडी संबोधले. तसेच काँग्रेसच्या धर्मनिरपेक्षतेच्या विचारांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ओवैसी यांनी मध्यप्रदेशमधील काँग्रेसचे वरिष्ठ नेते कमलनाथ यांनी बाबरी मशिदीबाबत केलेल्या विधानावर प्रतिक्रिया देताना नरेंद्र मोदी व राहुल गांधी यांच्यावर घणाघात केला.
ओवैसी म्हणाले की, बाबरी मशीद पाडण्यामध्ये जितका सहभाग भाजपा व आरएसएसची होती तितकाच सहभाग काँग्रेसचा होता. हे कमलनाथ यांच्या विधानामुळे सिद्ध झाले आहे. भाजपाप्रमाणे काँग्रेसही हिंदुत्वाच्या विचारसरणीवर काम करत आहेत. पुढील वर्षी जानेवारी महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणत्याही कार्यक्रमात जातील, तेव्हा ते राहुल गांधी यांनाही सोबत घेऊन जातील. ही राजकारणातील राम आणि शामची जोडी आहे. भाजपा आणि आरएसएसची माता काँग्रेस आहे. काँग्रेस आणि भाजपाच्या हिंदुत्वाच्या अजेंड्यामध्ये कुठलाही फरक नाही आहे, असा घणाघात ओवैसी यांनी केला आहे.
ओवैसी म्हणाले, बाबरी पाडण्यामध्ये भाजपा आणि आरएसएसच्या बरोबर काँग्रेसचीही मुख्य भूमिका होती. कमलनाथ यांचं विधानाने हे सिद्ध झालं आहे. रातोरात मूर्ती मंदिरात ठेवल्या गेल्या तेव्हा कुणाचं सरकार होतं. पूजा करण्याची परवानगी दिली गेली, तेव्हा सरकार कुणाचं होतं? राजीव गांधी यांनी दरवाजे उघडले आणि बाबरी मशीद हिरावली गेली. काँग्रेस धर्मनिरपेक्षतेचा खोटा चेहरा धारण करून राजकारण करते.
मध्य प्रदेशमधील विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान, कमलनाथ म्हणाले होते की, आपण इतिहास विसरता कामा नये. राजीव गांधी यांनी राम मंदिराचे दरवाजे उघडले होते. राम मंदिरात कुठल्याही एका पक्षाचे किंवा एका व्यक्तीचे श्रेय नाही. राम मंदिर भारतातील सर्व नागरिकांचं आहे. भाजप राम मंदिराचं श्रेय घेऊ शकत नाही. कमलनाथ यांच्या याच विधानावरून ओवेसींनी काँग्रेसवर निशाणा साधत मोदी व राहुल गांधी यांना राम व शामची जोडी म्हटले आहे.
संबंधित बातम्या