जाळपोळ, गुंडगिरी करणारे सैन्यात नकोत; माजी लष्कर प्रमुखांची आंदोलनावर नाराजी
Agneepath Scheme : दोन वर्षात भरती न झाल्यानं काहींचे वय निघून गेले अशांची अडचण समजून घेऊ शकतो असंही माजी लष्कर प्रमुख म्हणाले.
कारगिल युद्धावेळी भारतीय लष्कराचे प्रमुख म्हणून जबाबदारी पार पाडलेल्या जनरल व्हीपी मलिक (Genral VP Malik) यांनी अग्निपथ योजनेचं (Agneepath Scheme) समर्थन केलं आहे. यासह त्यांनी अग्निपथ योजनेचा विरोध कऱणाऱ्यांवर नाराजी व्यक्त करत प्रश्न उपस्थित केले आहेत. मलिक म्हणाले की, "गुंडगिरी करणाऱ्यांना लष्कर भरती करून घेणार नाही." देशातील अनेक भागात लष्कराच्या नव्या योजनेविरोधात आंदोलन सुरू आहे.
माजी लष्कर प्रमुख जनरल मलिक म्हणाले की, "आपल्याला हे समजून घ्यायला हवं की सशस्त्र बल हे वॉलिंटियर फोर्स आहे. ही कोणतीही कल्याणकारी संघटना नाही आणि यात सर्वात चांगले लोक असणं गरजेचं आहे. जे देशासाठी लढू शकतील, देशाचे संरक्षण करू शकतील. त्या लोकांना आम्ही लष्करात घेणार नाही जे लोक गुंडगिरी करतायत, बस आणि रेल्वे जाळतायत."
उमेदवारांकडून दोन वर्षांपासून भरती प्रक्रिया झाली नसल्याचं म्हणत आंदोलन केलं जात आहे. त्याबाबत मलिक म्हणाले की, "जेव्हा आम्ही भरती प्रक्रिया बंद केली तेव्हा काही जण चाचणी देऊ शकले नव्हते. यातील काही लोकांचे वय वयोमर्यादेपेक्षा जास्त झाले असेल. ते अग्निपथ योजनेला पात्र ठरणार नाहीत. अशा परिस्थितीत त्यांची अडचण समजून घेऊ शकतो."
नोकरीसाठी उमेदवारांना अडचण होणार नाही. कारण पोलिस आणि सशस्त्र बलांमध्ये प्राधान्याचे आश्वासन देण्यात आले आहे. मोठ्या संख्येनं खासगी क्षेत्रात भरती केली जाईल. पण नोकरीची हमी सध्या तरी नाही असंही मलिक यांनी म्हटलं.
चार वर्षानंतर काय या प्रश्नावर बोलताना मलिक यांनी म्हटलं की, "चांगलं शिक्षण आणि टेक सॅव्ही भरती करण्यावर जोर दिला जाईल. आयटीआय आणि इतर टेक्निकल संस्थांनांमधून लोक घेण्याचा प्रयत्न आहे. त्यांना बोनस पॉइंट्स दिले जातील आणि अशा प्रकारचे लोक आपल्याला सशस्त्र दलात हवे आहेत. तसंच योजना सुरू होऊ दे. त्यानतंर जेव्हा त्रुटी समोर येतील तेव्हा सुधारणा करता येतील."
संबंधित बातम्या