मणिपूर पेटण्याचं कारण काय? हिंसाचार रोखण्यासाठी सरकारनं काय केलं? अखेर अमित शहांनी लोकसभेत सांगितलं
Amit shah on Manipur violence : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की,मणिपूरमध्ये हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत, हे मान्य आहे.हिंसाचाराचेकुणीहीसमर्थन करणार नाही.
मणिपूरमधील हिंसाचाराचा मुद्दा उपस्थित करत विरोधी पक्षांनी मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव मांडला आहे. आसाममधील खासदार गौरव गोगोई यांनी अविश्वास प्रस्तावसादर केल्यानंतर यावर दोन दिवसांपासून चर्चा सुरू आहेत. आज लोकसभेत काँग्रेस खासदार राहुल गांधी,केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यासह इतर खासदारांची भाषणं झाल्यानंतर गृहमंत्री अमित शाह यांनी या सगळ्यावर भाष्य केलं आहे. शहा यांनी आपल्या जवळपास सव्वा दोन तासांच्या भाषणात मणिपूरच्या मुद्द्यावर भाष्य केलं.यावेळी शहा यांनी मणिपूरमधील हिंसाचारामागचं कारण सांगितलं तसेच सरकारने यावर काय केलं याचा खुलासाही केला..
ट्रेंडिंग न्यूज
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, मणिपूरमध्ये हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत, हे मान्य आहे. हिंसाचाराचे कुणीही समर्थन करणार नाही. आम्हीही सहमत नाही. समाजाला लाज आणणाऱ्या घटना तेथे घडल्या आहेत. हे कुणीही नाकारू शकत नाही. मात्र त्यावर राजकारण करणं हे सुद्धा तितकंच लाजिरवाणं आहे.
अमित शहा म्हणाले की, मणिपूरमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या घटनेवर चर्चा करण्यासाठी सरकार तयार नाही, असा भ्रम पसरवला गेला. मात्र मी या सभागृहासमोर स्पष्ट करू इच्छितो की, सभागृहाची सुरुवात होण्यापूर्वीपासून मी चर्चा करण्यास तयार असल्याचे अध्यक्षांना पत्र लिहून सांगितलं होतं. मी पहिल्या दिवसापासून सांगतोय की, मी मणिपूरवर चर्चा करण्यास तयार आहे. मात्र विरोधकांना चर्चा करायची नव्हती.
जर माझ्या उत्तरानं समाधान झालं नसतं तर पंतप्रधानांना बोलायला सांगितलं असतं त्यांनीही विचार केला असता, असे अमित शहा म्हणाले. तुम्हाला कशा प्रकारची लोकशाही व्यवस्था हवी आहे, असा सवालही त्यांनी केला.
अमित शाह म्हणाले,मणिपूरमधील वातावरण बिघडायला २०२१ मध्ये सुरुवात झाली होती. २०२१ मध्ये आपल्या शेजारी असलेला देश म्यानमारमध्ये सत्तापरिवर्तन झालं. तिथलं डेमोक्रेटिक सरकार पडून मिलिटरी राज आलं. त्यामुळे म्यानमारमधील कुकी डेमोक्रेटिक संघटना लोकशाहीसाठी आंदोलनं करू लागली. परिणामी तिथल्या मिलिटरी शासनाने कुकी समुदायावर दबाव आणला. भारत आणि म्यानमारची सीमा मोकळी आहे. सीमारेषेवर कोणतंही फेन्सिंग (कुंपण) नाही. ही परिस्थिती आपला देश स्वतंत्र झाला तेव्हापासूनची आहे. म्यानमारमध्ये मिलिटरी राज आल्यावर तिथले कुकी समुदायातले लोक भारतात येऊ लागले. हजारोंच्या संख्येने कुकी लोक मणिपूर आणि मिझोरमच्या जंगलांमध्ये राहू लागले. परिणामी मणिपूरच्या इतर भागांमध्ये राहणाऱ्या लोकांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं.
शहा म्हणाले की, मणिपूरमधील घुसखोरी रोखावी यासाठी आम्ही कुंपण घालण्यास सुरुवात केली. येथे खोऱ्यात मैतेई राहतात. तर पर्वतीय भागात कुकी आणि नागा राहतात. आपण अल्पमतात येऊ अशी तेथील स्थानिकांमध्ये भीती होती. त्यामुळे आम्ही स्थलांतरितांची ओळख पटवून तशी नोंद करण्यास सुरुवात केली, अशी माहितीही अमित शहा यांनी दिली.
दरम्यान, येथील स्थलांतरीतांच्या वसाहतींना गाव घोषित केल्याची अफवा पसरली. याबाबत सत्य सांगण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र अफवा वेगाने पसरल्या. त्यानंतर आगीत तेल ओतण्याचं काम मणिपूर उच्च न्यायालयाच्या एका निर्णयानं केलं. मैतेईंना आदिवासी घोषित करा, असे आदेश कोर्टाने दिले. त्यामुळे पर्वतीय भागात असंतोष सुरू झाला. त्यातून ३ तारखेला ठिणगी पडली. आणि दंगे सुरू झाले. ते अद्याप सुरू आहेत, असे अमित शह यांनी सांगितले.