Amit Shah: २००२ साली दंगेखोरांना धडा शिकवला; गुजरातच्या निवडणूक प्रचारसभेत अमित शहांचे विधान
गुजरातमध्ये जातीय दंगलीत सामील असलेल्या समाजकंटकांचा असा धडा शिकवला गेला की गुजरात गेली २२ वर्ष शांत आहे, असं वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी केले.
गुजरातमध्ये जातीय दंगलीत सामील असलेल्या समाजकंटकांचा असा धडा शिकवला गेला की गुजरात गेली २२ वर्ष शांत आहे, असं वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी केले. गुजरात विधानसभा निवडणुकीनिमित्त अमित शहा यांनी खेडा जिल्ह्यातील महुधामध्ये प्रचारफेरी काढण्यात आली होती. यावेळी शहा यांनी वरील वक्तव्य केले.
गुजरातमध्ये कॉंग्रेसचं सरकार असताना (१९९५ पूर्वी) राज्यात सतत दंगली होत असत. कॉंग्रेस पक्ष हा वेगवेगळ्या जाती-धर्मातील लोकांना उचकावून आपआपसांत भांडणं लावत होता. दंगलींच्या माध्यमातून कॉंग्रेस पक्षाने ‘व्होट बँक’ मजबूत केली होती. समाजातील एका मोठ्या वर्गावर अन्याय केला होता’, असा आरोप शहा यांनी यावेळी केला. २००१ साली नरेंद्र मोदी (गुजरातमध्ये) सत्तेत आले आणि २००२ नंतर कुठेही संचारबंदी लावण्याची गरज उरली नाही. सर्वजण जागेवर आले. आता कुठे माफिया आहेत? कुठे गुंड आहेत?, असा प्रश्न शहा यांनी विचारला.
केंद्रात २००४ ते २०१४ या १० वर्षांच्या कॉंग्रेसच्या कार्यकाळात १२ लाख कोटी रुपयांचे घोटाळे झाल्याचा आरोप शहा यांनी प्रचारसभेत केला. काँग्रेस नेत्यांनी गरिबी हटविण्याऐवजी गरिबांनाच हटविले, स्वतःची घरे पैशांनी भरली असं शहा म्हणाले.
गुजरात दंगल प्रचाराचा मुद्दा
गोध्रा येथील रेल्वे जळीतकांडानंतर फेब्रुवारी २००२ मध्ये गुजरातमध्ये अनेक ठिकाणी जातीय दंगल पेटली होती. यात १००० नागरिक ठार झाले होते. तीन दिवस ही दंगल शमली नव्हती. दंगल नियंत्रणात आणण्यासाठी अनेक ठिकाणी वेळीच कारवाई केली नसल्याचा पोलिसांवर आरोप त्यावेळी करण्यात आला होता.
गुजरात विधानसभेसाठी येत्या १ आणि ५ डिसेंबर रोजी निवडणुका होत असून ८ डिसेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. यंदा गुजरातमध्ये सत्ताधारी भाजपसमोर कॉंग्रेससह आम आदमी पक्षाचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.