Agneepath आंदोलनाला हिंसक वळण, पोलिसांच्या गोळीबारात तरुणाचा मृत्यू
अग्निपथ योजनेच्या विरोधातील आंदोलक आक्रमक झाल्याने पोलिसांनी त्यांना रोखण्यासाठी गोळीबार केला.
लष्करात अग्निपथ योजनेतून (Agneepath Scheme) भरती विरोधात देशभरात तरुण आंदोलन करत आहेत. या आंदोलनाला हिंसक वळण लागले असून एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. तेलंगनातील (Telangana) सिकंदराबाद (Secunderabad) रेल्वे स्टेशनवर सकाळी मोठ्या संख्येनं तरुण आंदोलनासाठी पोहोचले होते. यावेळी काहींनी रेल्वेला आग लावली आणि तोडफोडसुद्दा केली. पोलिसांवर दगडफेकही करण्यात आली. यावेळी आक्रमक झालेल्या आंदोलकांना नियंत्रित करण्यासाठी सुरक्षा दलाने गोळीबार केला. (telangana agnipath protest turned violent 1 killed and 8 injured)
पोलिसांनी गोळीबारात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत असून ८ जण जखमी झाले आहेत. जखमींना सिकंदराबादमधील गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तेलंगनातील शहरात मुख्य रेल्वे स्टेशनवर शेकडो तरुण आंदोलनासाठी पोहोचले होते. एका रेल्वेला आगही लावली होती. यामुळे रेल्वेसेवाही विस्कळीत झाली होती.
एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने म्हटलं की, आंदोलकांनी सुरु केलेली जाळपोळ, दगडफेक यामुळे जीआरपीला गोळीबार करावा लागला. याआधी लाठीचार्ज आणि अश्रूधुराच्या नळकांड्यांचा वापर करण्यात आला होता. तरीही आंदोलकांकडून तोडफोड, जाळपोर सुरुच होती. शेवटी गोळीबार करण्याचा निर्णय घेतला. जीआरपीने १५ गोळ्या झाडल्या. आंदोलकांकडून दगडफेकीत दोन पोलिस जखमी झाले आहेत. या घटनेनंतर रेल्वेचे पोलिस महासंचालक संदीप शांडिल्य आणि इतर वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.
आंदोलकांनी रेल्वेच्या काही डब्यांना आग लावली आणि रेल्वेच्या मालमत्तेचं मोठ्या प्रमाणावर नुकसान केलं. आंदोलकांकडून सुरू झालेला गोंधळ इतका होता की अखेर रेल्वे प्रशासनाने स्टेशनवर येणाऱ्या रेल्वे बाहेरच थांबलल्या होत्या. शेकडो आंदोलक रेल्वे स्टेशनमध्ये अचानक घुसून गोंधळ घालायला लागल्याचं पोलिसांनी म्हटलं. स्टेशनवर असलेल्या लहान स्टॉल्सचेही नुकासन केले, त्यांच्या हातात काठ्या होत्या आणि दगडफेकही करत होते अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
संबंधित बातम्या