telecom users data leaked in India : देशातील जिओ आणि एअरटेलसह एकूण ७५ कोटी टेलिकॉम ग्राहकांना धोका निर्माण झाला आहे. या ग्राहकांचा अत्यंत संवेदनशील डेटा डार्क वेबवर लिक झाला असून तो नाममात्र किमतीत विकला जात आहे. यात आधार क्रमांक आणि फोन नंबरसह अनेक वैयक्तिक बाबींच्या तपशीलांचा देखील समावेश आहे, या माहितीद्वारे हॅकर्स मोठ्या प्रमाणात सायबर गुन्हे करू शकतात.
एका अहवालानुसार, हे प्रकरण गांभीर्य घेऊन भारतातील दूरसंचार विभागाने (DoT) ७५ कोटी पेक्षा जास्त ग्राहकांची संवेदशील माहिती लिक केल्यामुळे देशातील सर्व दूरसंचार कंपन्यांना सुरक्षा ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत. या बाबत भारतातील सायबर सुरक्षा फर्म CloudSEK ने चिंता व्यक्त केली आहे. या कंपनीने दावा केला आहे की, हॅकर्स डार्क वेबवर १.८ टेराबाइटचा हा भारतीयांचा डेटा विकत आहेत, ज्यामध्ये देशातील टेलिकॉम ग्राहकांची खाजगी माहितीचा समावेश आहे.
लिक डेटामध्ये सामान्य मोबाइल वापर कर्त्यांची माहितिचा समावेश आहे. यात नाव, मोबाइल नंबर, पत्ता आणि अगदी आधार क्रमांक या संवेदनशील माहितीचा समावेश आहे. CloudSEK कंपनीच्या म्हणण्यानुसार या माहितीच्या आधारावर सायबर चोरटे मोठा सायबर हल्ला करू शकतात. द इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार, देशातील दूरसंचार कंपन्यांनी डीओटीला या बाबत माहिती दिली आहे. लीक झालेली माहिती विविध टेलिकॉम ग्राहकांच्या जुन्या डेटा संचांचा संग्रह असून टेलिकॉम ऑपरेटर्सच्या पायाभूत सुविधांमधील तांत्रिक चुकांमुळे ही माहिती लिक झाल्याचे कंपन्यांचे म्हणणे आहे.
CloudSEK मधील थ्रेट इंटेलिजन्स आणि सिक्युरिटी संशोधक स्पर्श कुलश्रेष्ठ यांनी सांगितले की, लीक झालेला डेटा हा संवेनशील असून समाविष्ट असलेला संपर्क क्रमांक आणि आधार तपशील वैध असल्याचे आढळून आले आहे. तब्बल ७५ कोटी नागरिकांची ही खासगी माहिती केवळ ३ हजार अमेरिकन डॉलर्स म्हणजेच सुमारे २.५ लाख रुपयांमद्धे मध्ये डार्क वेबवर विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
हा डेटा हॅकर्सद्वारे सायबर हल्ल्यांसाठी वापरला जाऊ शकतो. यामुळे एखाद्याची ओळख चोरी, अब्रू नुकसान आणि आर्थिक फसवणूक देखील केली होऊ शकते. सध्या, या चोरीचे नेमके प्रमाण किती याची माहिती घेतली जात आहे. जिओ, एयरटेल, व्हीआय आणि इतर दूरसंचार कंपन्यांनी या संदर्भात मात्र, मौन बाळगले आहे. इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT-In) देखील त्यावर लक्ष ठेवत असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, अद्याप अधिकृत माहिती कुणीही दिली नाही.
दरम्यान, भारतीय टेलिकॉम कंपन्यांननी स्पॅम टेक्स्ट मेसेज आणि ईमेलपासून सावध राहावे असे आवाहन मोबाइल ग्राहकांना केले आहे. एखाद्याने त्यांच्या इनबॉक्समध्ये दिसणाऱ्या चुकीच्या लिंक्स किंवा संलग्नकांवर क्लिक करणे टाळावे. जेव्हा माहिती चोरली जाते तेव्हा फिशिंग हल्ल्यांचे प्रमाण वाढते. वैयक्तिक स्तरावर डेटाचे उल्लंघन कोणीही रोखू शकत नसले तरी, काही सोप्या सुरक्षा उपायांचे पालन केल्याने वापरकर्त्यांना संभाव्य धोक्यापासून संरक्षण मिळू शकते.
संबंधित बातम्या