उत्तर प्रदेशातील हाथरस येथून निघालेली बस गुरुवारी जम्मू जिल्ह्यातील अखनूर भागात दरीत कोसळून झालेल्या अपघातात ९ महिला आणि दोन मुलांसह २२ भाविकांचा मृत्यू झाला, तर ५७ जण जखमी झाले.
अखनूर पोलिस ठाण्याचे स्टेशन हाऊस ऑफिसर इन्स्पेक्टर तारिक अहमद यांनी सांगितले की, जम्मू-पुंछ राष्ट्रीय महामार्गावरील अखनूरपासून १२ किमी अंतरावरील तुंगी मोड़ येथे दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. बसमध्ये किती प्रवासी होते, हे अद्याप समजू शकलेले नाही. बचावकार्य सुरू असल्याचे अहमद यांनी सांगितले.
अखनूर उपविभागीय तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सलीम खान यांनी सांगितले की, आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू झाला असून ५७ जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी अनेकांना जम्मूच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात हलविण्यात आले आहे, तर काहींना अखनूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अखनूर एसएचओ म्हणाले की, ड्रायव्हरला झोप आली असावी. वळणावर बस सुमारे दीडशे ते दोनशे फूट दरीत कोसळली.
बचाव कार्यात सहभागी झालेल्या स्थानिक रहिवाशांपैकी एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, बस खूप वेगाने वळणावर आली आणि दरीत कोसळली.
जम्मूचे उपायुक्त सचिन कुमार वैश्य यांनी 'एक्स'वर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, उत्तर प्रदेशातील हाथरस येथून प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसला जम्मूतील तांडा, अखनूरजवळ अपघात झाला आहे.
जम्मू-काश्मीरचे परिवहन आयुक्त राजिंदर सिंह तारा यांनी सांगितले की, ड्रायव्हर तीव्र वळणावर गाडीवर नियंत्रण मिळवू शकला नाही व बस दरीत कोसळली. कदाचित ड्रायव्हरला झोप आली असाली.
अखनूर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या जखमींपैकी अमर चंद यांनी सांगितले की, चालक वळणावर जात असताना समोरून एक कार आली. कारला कट मारण्याच्या नादात हा अपघात झाला.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.
'अखनूरमध्ये झालेल्या बस अपघातात झालेल्या जीवितहानीमुळे दु:ख झाले आहे. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले त्यांच्यासमवेत माझ्या संवेदना आहेत. मी प्रार्थना करतो की जखमी लवकर बरे व्हावेत. बस अपघातातील मृतांच्या वारसांना दोन लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे. जखमींना ५० हजार रुपये दिले जातील, असे पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे.
संबंधित बातम्या