हैदराबाद शहराजवळील एका गावातून कुत्र्यांसोबत क्रुरतेची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील संगारेड्डी जिल्ह्यातील एडुमैलाराम गावात अज्ञात व्यक्तींनी २१ कुत्र्यांची हत्या केल्याची खळबळजक घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४० फूट उंच पुलावरून फेकल्याने २१ कुत्र्यांचा मृत्यू झाला आहे. इतर ११ कुत्र्यांची प्रकृती चिंताजनक आहे. आरोपींनी या कुत्र्यांचे हात, पाय आणि तोंड बांधले होते. प्राण्यांसाठी काम करणाऱ्या सिटिझन फॉर अॅनिमल्स या संस्थेच्या काही स्वयंसेवकांना घटनास्थळाजवळून ओरड्याचा आवाज येत असल्याची माहिती ४ जानेवारी रोजी मिळाली होती.
सिटिझन फॉर अॅनिमल्स या संस्थेने सांगितले की, "तक्रारीनंतर जेव्हा तो तेथे पोहोचला तेव्हा त्यांना एक भयानक दृश्य दिसले. येथे मृत साथीदारांच्या सडलेल्या मृतदेहांमध्ये काही जखमी कुत्रे किंचाळत होते. काही मृतदेह किड्यांनी भरलेले होते. काही मृतदेह पाण्यात तरंगत होते. यावरून या घटनेला अनेक दिवस उलटून गेल्याचे दिसून येते. संघटनेने सांगितले की, त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. आम्ही अॅनिमल वॉरियर्स कन्झर्वेशन सोसायटी (एडब्ल्यूसीएस) आणि पीपल फॉर अॅनिमल्स (पीएफए) हैदराबाद कडून मदत मागितली.
अनेक तासांच्या प्रयत्नानंतर ११ जखमी कुत्र्यांची सुटका करून त्यांना नागोळे येथील पीएफए निवारा केंद्रात नेण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
संस्थेच्या कार्यकर्त्यांनी इंद्रकरण पोलिसात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत. इंद्राकरण पोलिस ठाण्याच्या एका पोलिस अधिकाऱ्याने माध्यमांना सांगितले की, प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की पुलाखाली गंभीर जखमी अवस्थेत आढळलेल्या कुत्र्यांना पुलावरून फेकण्यात आले होते.
मात्र, त्याला आत्ताच दुजोरा देता येणार नाही. स्थानिक लोकांकडून या घटनेची माहिती गोळा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अधिक पुरावे गोळा करण्यासाठी कुत्र्यांचे अवशेष शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत.