विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात पुन्हा मराठा आरक्षणाच्या मागणीने जोर धरला आहे. मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यापासून आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा उपोषण सुरू केले आहे. मात्र सरकारकडून कसलाही प्रतिसाद न मिळाल्याने जरांगे यांनी उपोषण मागे घेतलं आहे. आता थेट मुंबईत घुसणार असा इशारा जरांगे यांनी दिला आहे. मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी लढा तीव्र करत असतानाच दुसरीकडे मराठा आरक्षणासाठी संभाजीनगरमध्ये एका तरुणाने आपले जीवन संपवले आहे.
छत्रपती संभाजीनगरमधील सिल्लोड येथे एका तरुणाने मराठा आरक्षणासाठी जीव दिला आहे. शेततळ्यात उडी मारून त्याने आत्महत्या केली. समाधान रायभान काळ (वय ३८ ) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. समाधान याने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत मराठा आरक्षणासाठी सरकारकडून फसवणूक होत असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे आपण जीवन संपवत असल्याचे म्हटले आहे.
समाधान काळे या तरुणाचे बारावीपर्यंत शिक्षण झालं असून तो सिल्लोड तालुक्यातील खुपटा येथील रहिवासी होता. समाधान याने शनिवारी गावाजवळील शेततळ्यात उडी घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला. त्याच्याजवळ पोलिसांना सापडलेल्या चिठ्ठीत आत्महत्येचं कारण नमूद केलं आहे. या आत्महत्येनं तरी सरकारचे डोळे उघडतील, अशी आशा त्यांनी चिठ्ठीत व्यक्त केली आहे.
तरुणाकडे सापडलेल्या चिठ्ठीत म्हटले की, सततची नापिकी आणि शेकडो मोर्चे-आंदोलनं करुन देखील मराठा समाजाला आरक्षण मिळालेले नाही. सरकारकडून मराठा समाजाची फसवणूक केली जात आहे. या सगळ्याला कंटाळून मी आत्महत्या करत आहे. या आत्महत्येनं तरी सरकारने डोळे उघडावेत. गरजवंत मराठा समाजाला आता तरी शासनाने न्याय द्यावा. एक मराठा लाख मराठा, असं चिठ्ठी लिहून समाधानने आपलं जीवन संपवलं आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
संबंधित बातम्या