महाराष्ट्रात गुजराती लोक भाजपला मतं देतात, त्याला गुजरात्यांचा व्होट जिहाद म्हणायचं का?; विरोधकांचा फडणवीसांना सवाल
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  महाराष्ट्रात गुजराती लोक भाजपला मतं देतात, त्याला गुजरात्यांचा व्होट जिहाद म्हणायचं का?; विरोधकांचा फडणवीसांना सवाल

महाराष्ट्रात गुजराती लोक भाजपला मतं देतात, त्याला गुजरात्यांचा व्होट जिहाद म्हणायचं का?; विरोधकांचा फडणवीसांना सवाल

Published Oct 03, 2024 02:57 PM IST

Sanjay Raut on Vote Jihad : लोकसभा निवडणुकीत काही मतदारसंघांमध्ये ‘व्होट जिहाद’ झाल्याचं म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सडकून टीका केली आहे.

'महाराष्ट्रात गुजराती लोक भाजपला मतं देतात, त्याला गुजरात्यांचा व्होट जिहाद म्हणायचं का?'
'महाराष्ट्रात गुजराती लोक भाजपला मतं देतात, त्याला गुजरात्यांचा व्होट जिहाद म्हणायचं का?'

Vote jihad : लोकसभा निवडणुकीत काही मतदारसंघात 'व्होट जिहाद' झाल्याचं वक्तव्य करणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज अक्षरश: झोडपून काढलं. ‘व्होट जिहाद म्हणजे काय हे देवेंद्र फडणवीस आणि भाजपनं आम्हाला सांगावं. महाराष्ट्रातील गुजराती लोक भाजपला मतं देतात, मग तो गुजरात्यांचा व्होट जिहाद आहे का,’ असा रोखठोक सवाल संजय राऊत यांनी केला.

ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.  'व्होट जिहाद म्हणजे काय? मुस्लिम, जैन, हिंदू, पारशी हे सगळे देशाचे नागरिक आहेत. त्यांनी भाजपला मतदान केले सगळं ठीक. पण इतर पक्षांना दिलं की व्होट जिहाद. व्होट जिहादचीच चर्चा करत असाल तर भाजपनं मुस्लिम महिलांसाठी तिहेरी तलाकचा कायदा का आणला?, असा प्रश्न राऊत यांनी केला.

‘देशातील इतर समाजातील लोकही भाजपला मतदान करतात. त्याला ते काय म्हणणार? गुजरातमधील लोक महाराष्ट्रात भाजपला मतदान करतात, असं आम्हाला कळलंय. मग तो गुजरात्यांचा व्होट जिहाद आहे असं म्हणायचं का? काय चालवलंय तुम्ही लोकांनी देशात? फडणवीस सारख्या लोकांना हा देश पुन्हा तोडायचा आहे का?,’ असा संताप राऊत यांनी यावेळी व्यक्त केला.

'हा गांधीजींचा देश आहे असं म्हणता ना? कालच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गांधीजींवर मोठं प्रवचन दिलं. आपण सगळे गांधी विचारांपासून दूर गेलो आहोत, असं ते म्हणाले. ते कुठं गांधी विचारांवर चाललेत? हा व्होट जिहाद वगैरे सगळा त्यांच्या डोक्यातला कचरा आहे, असं राऊत म्हणाले.

फडणवीसांना लाज वाटली पाहिजे!

‘देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही टीका केली आहे. 'फडणवीस यांना लाज वाटली पाहिजे. ते राज्याचे गृहमंत्री असून घटनात्मक पदावर आहेत. निवडणुकीच्या वेळी अशी विधानं करून आणि धर्माच्या आधारावर लढून भाजप जे क्षुल्लक राजकारण करतो, तेच राजकारण खुद्द फडणवीसांना करायचं आहे. फडणवीसांनी या वक्तव्याबद्दल राज्यातील जनतेची माफी मागावी, अशी मागणी पटोले यांनी केली आहे.

काय म्हणाले होते फडणवीस?

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील ४८ पैकी १४ मतदारसंघांत 'व्होट जिहाद' झाल्याचा दावा देवेंद्र फडणवीस यांनी एका भाषणात केला होता. त्यासाठी त्यांनी धुळे लोकसभा मतदारसंघाचा दाखला दिला होता. धुळे मतदारसंघात पाच विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार १ लाख ९० हजार मतांनी आघाडीवर होते. मात्र, मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघातील मतदानामुळे आमचा उमेदवार १ लाख ९४ हजार मतांनी पिछाडीवर पडला आणि अवघ्या चार हजार मतांनी पराभूत झाला, असं ते म्हणाले होते.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर